लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात नळ-पाणी पुरवठा योजना करण्यात अडचणी येत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी हातपंपाशिवाय पर्याय राहत नाही. सातपुड्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात दोन वर्षात शेकडो कुपनलिका खोदण्यात आल्या, परंतु त्यावर हातपंपच बसविला गेला नसल्यामुळे त्या कुपनलिका निरुपयोगी ठरल्या असल्याचे चित्र आहे. येत्या उन्हाळ्यात तरी हातपंप बसवून पाण्याची सोय करावी अशी अपेक्षा गाव, पाड्यातील नागरिकांकडून होत आहे.सातपुड्यातील भौगोलिक परिस्थिती पहाता नळपाणीपुरवठा योजना करणे जिकरीचे आहे. त्यामुळे विहिर किंवा कुपनलिका यांचाच आधार असतो. त्यामुळे अशा भागात मोठ्या प्रमाणावर कुपनलिका मंजुर केल्या जातात. या कुपनलिका मंजुर होत असल्या तरी शासनाच्या निकषानुसार ठराविक मर्यादेपर्यंतच त्या केल्या जातात. तेवढ्या मर्यादेत पाणी लागले नाही तर त्या निरुपयोगी ठरतात. परंतु ज्या ठिकाणी पाणी लागते त्या ठिकाणी अनेकवेळा हातपंपच बसविला जात नसल्याची स्थिती आहे. गेल्या वर्षी खोदून ठेवलेल्या कुपनलिकांवर यंदाचा उन्हाळा आला तरी हातपंप बसविण्यात आला नसल्याची स्थिती आहे.याबाबत यंदातरी या कुपनलिकांवर हातपंप बसवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या वर्षाच्या कुपनलिकांवर हातपंप बाकी असतांना आता नवीन कुपनलिका खोदाई होणार आहे.दरम्यान, हातपंप दुरूस्तीसाठी नेमण्यात आलेल्या पथकांची वाहने ही जुनी झाली आहेत. त्यामुळे ती वाहने निर्लेखीत करून त्याऐवजी दुसरी वाहने घेण्याची शिफारस यापूर्वीच करण्यात आली आहे. पंचायत समिती स्तरावर ही वाहने खरेदी केली जाणार आहेत.याशिवाय यांत्रिकी विभागाअंतर्गत तालुकास्तरावर हातपंप दुरूस्तीसाठी टंचाई निवारणार्थ तातडीची बाब म्हणून वाहनांसह कंत्राटी मणुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी देखील तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.
चालू आर्थिक वर्षात प्रस्तावीत विंधन विहिरी आणि कुपनलिका खोदाई कामासाठी नुकतीच जिल्हा परिषदेची प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली आहे. त्यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता देखील घेण्यात आली आहे.