रविवारी दुपारच्या सुमारास सुमारे साडेसात एकर परिसरात अफूची शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे व पथकाने धाड टाकून कारवाई सुरू केली. मंगळवारी सकाळी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कापणी करण्यात आलेल्या पिकाच्या प्रत्यक्ष मोजमापास शासकीय पंचांसमोर सुरुवात झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रत्येकी २१ किलो वजनाचे २३५ पोत्यांचे असे सुमारे चार हजार ९३५ किलो अफू पिकाचे मोजमाप पूर्ण झाले असून बुधवारी दुपारपर्यंत कापणीसह संपूर्ण मोजमाप प्रक्रिया पार पाडली जाईल. ही कारवाई बुधवारी सुरू राहणार असून त्यानंतरच प्रत्यक्षात या साडेसात एकरातून किती किलो अफूचे उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे.
संपूर्ण रात्रभर या प्रकाराची चौकशी परिसरात पोलिसांतर्फे केली जात आहे. या अफूच्या शेतीचे मोजमाप करण्यात येऊन सुमारे १०० मजुरांच्या मदतीने अफूची कापणी सुरु आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत नेमका किती किलो अफू आहे हे स्पष्ट होईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी दिली.
तीन दिवसांच्या पोलीस कारवाईनंतर एकूण चार हजार ९३५ किलो अफूचे उत्पादन मोजमापात निष्पन्न झाले आहे. यापेक्षा कितीतरी अधिक पट या सात एकर परिसरात अफूचे उत्पादन घेतले गेले असल्याने आजपर्यंत हा जिल्ह्यातील बेकायदेशीरपणे अफू लागवडीचा उच्चांक ठरण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून पोलीस प्रशासनातर्फे केवळ संशयितांची चौकशी सुरू आहे. अद्यापपर्यंत अधिकृतपणे कुठलाही गुन्हा नोंदविण्यात आला नसून कोणालाही कायदेशीररित्या अटक करण्यात आलेली नसल्याने याप्रकरणी पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूचे उत्पादन सापडल्यानंतर पोलीस प्रशासनाने याप्रकरणी गांभीर्याने कारवाई करून पारदर्शीपणे तपास करण्यासह यातील मुख्य संशयिताला व मास्टर माईंडला बेड्या ठोकण्याची गरज असून या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे उघड करणे गरजेचे आहे.