नंदुरबार : कोरोनामुळे रोजगाराच्या संधी हिरावल्या जात असताना नंदुरबार जिल्ह्यात मात्र गेल्या वर्षभरात तब्बल १३१ नवे उद्योग उभे राहिले आहेत. यातून ३० कोटी रुपयांची थेट गुंतवणूक झाली असून, यातून जिल्ह्यातील उद्योगजगताला येत्या काळात बुस्टर मिळून रोजगार निर्मिती शक्य झाली आहे.
सन २०२०मध्ये समोर आलेल्या कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका हा छोट्या - मोठ्या उद्योगांना बसला आहे. यातून एप्रिल ते ऑक्टोबर २०२० या काळात जिल्ह्यातील दीड हजार छोट्या - मोठ्या उद्योगांना आर्थिक फटका बसून रोजगार निर्मितीवर परिणाम झाला होता. कालांतराने सुरु झालेल्या उद्योगांना आता पुन्हा लाॅकडाऊनमुळे ब्रेक लागला असतानाच शासनाच्या योजनांमधून अर्थसहाय्य मंजूर झाल्याने गेल्या तीन महिन्यात १३१ उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत. येत्या सहा महिन्यात हे सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत. प्रामुख्याने रोजगार निर्मितीला हे सर्व उद्योग कारणीभूत ठरणार आहेत. एकाच वेळी अनेकविध उद्योगधंदे सुरु होणार असल्याने गेल्या लाॅकडाऊनमध्ये रोजगार हिरावला गेलेल्यांना या लाॅकडाऊनमध्ये रोजगार परत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.
मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम
जिल्हा उद्योग केंद्रामार्फत गेल्या वर्षीपासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम चालवण्यात येतो. यांतर्गत ५० लाख रुपयांचा निधी बँकांमार्फत उद्योजकांना दिला जातो.
यांतर्गत २०२० - २०२१ या वर्षात एकूण ९७ प्रस्ताव मंजूर करून त्यांना बँकांमार्फत निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री रोजगार उपक्रम
दरम्यान, जिल्ह्यात प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रम राबवण्यात येतो. यातून ३४ उद्योग मंजूर झाले आहेत. या उद्योगांना सरासरी २५ लाख रुपयांचे कर्ज बँकांनी दिले होते.
हे उद्योग पूर्णपणे सुरु झाल्याची माहिती असून, यातून महिलांनी रोजगार निमिर्ती घडवून आणल्याची माहिती आहे.
विविध उद्योग : राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांनी कर्ज दिलेल्या प्रस्तावात वस्त्रोद्योग, टलेरिंग, फॅब्रिकेशन, मसाला युनिट यांसह विविध उद्योगांचा समावेश आहे. थेट कर्ज मिळाल्याने ऐन लाॅकडाऊन काळातही हे उद्योग यशस्वीपणे सुरु आहेत.
३६३ अत्यावश्यक उद्योग सुरू
नंदुरबार जिल्ह्यात एकूण १ हजार ४३९ उद्योग आहेत. शासनाच्या आदेशानुसार केवळ अत्यावश्यक असलेल्या उद्योगांना लाॅकडाऊन काळात परवानगी होती. यामुळे यातील ३६३ उद्योग सध्या सुरु आहेत. हे उद्योग जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे असल्याने त्यांच्याकडून कामकाज सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. याठिकाणी कामगारांना कोविड नियमांचे पालन करुन कामावर बोलावले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे अनेक ठिकाणी कर्मचारी निवासस्थाने नसल्याने त्याठिकाणचे उद्योग सध्यातरी बंद ठेवण्यात आल्याची माहिती उद्योग विभागाकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनांमधून १३१ उद्योगांना मान्यता देत बँकांचे अर्थसहाय्य मिळवून देण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील उद्योग धंद्यांना यातून चालना मिळाली आहे. या उद्योगधंद्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. यातून जिल्ह्यात रोजगार निर्मिती होण्यास मदत मिळाली आहे.
- उपेंद्र सांगळे, महाव्यवस्थापक,
जिल्हा उद्योग केंद्र, नंदुरबार.