यात आदिवासींचे निसर्ग संस्कृतीशी असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, पोशाख, समूहनृत्य, दान-दागिने, पारंपरिक वाद्ये अशा अनेक आदिवासींच्या वेगळेपणावर आधारित समूहाचा हा सण आहे. ज्यात आदिवासी आपली सर्व सुख-दुःखे विसरून आनंद, उत्साह व समरसता याचा मिलाफ घडवून आणतात आणि यातूनच अवघ्या विश्वाला साद घालणारी आदिवासी संस्कृती प्रत्ययास येते. सर्वाना एकत्रित करून समूहजीवनाचे धडे देते.
या वेळी ‘होळी म्हणजेच आदिवासी आणि आदिवासी म्हणजेच होळी’ हे समीकरण बनते आणि आदिम अस्तीत्व-प्रतीकांची जीवंत अनुभूती घेता येते. मात्र सातपुड्यातील आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक होळीवर प्रथमच काळाने घाला घातला असून, कोरोना या महाभयंकर विषाणुने संपूर्ण जग हादरवून सोडले आहे. याचाच एक भाग म्हणून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने घालून दिलेल्या काही नियमांना बघता यावर्षी सातपुड्यातील आदिवासी समाजाची दिवाळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या होळी महोत्सवावर यंदा ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळीवर कोरोनाचे संकट असून, सातपुड्यातील ढोल-ताशांचा गजर होलिकोत्सवामुळे पूर्ण पहाडात दूमदूमत होता. मात्र यावर्षी आदिवासींचा नशिबीहे सर्व नसल्याचे दिसत असून। याला ब्रेक लागणार असल्याचे चित्र आहे.
जशी वसंताची चैत्रपालवी नव्या सुरूवातीची चाहूल घेऊन येते, तशी होळी आदिवासींच्या जीवनात नवचैतन्य घेऊन येते. होलिकोत्सव उत्साह उधळायला, मनसोक्त नाचायला, गायला लावते. खरतर होळी आदिवासींच्या दु:खावर पांघरूण घालते. दुःख विसरून आनंदाचा शोध घ्यायला लावते. नवनिर्मितीची प्रेरणा देते. दुःख-गरिबीतही आनंदाने नाचता येते. होळी अशीच सहजपणे सर्वाना सामावून घेते. नवीन उत्साह व उभारी देते. ढोलच्या तालावर एकत्र येत नाचू लागतात. एकमेकांशी एकरूप होऊन होळी साजरी केली जाते.
दरवर्षी उत्साहात साजरा होणारी होळी माणसाला माणूस बनवते, निसर्गाच्या सानिध्यात घेऊन. आदिवासीत्व शिकवते तेही प्रेम, सहकार्य, सेवा, पाहूणचार असं सर्वच देते, मायेच्या आशिर्वादासह आणि वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा व उत्साह देते. मात्र या सर्वांवर यंदा कोरोनाने पाणी फिरवलं असेच म्हणावं लागेल.