वर्षभरापूर्वी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने रुग्ण आढळलेल्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते. तसेच सार्वजनिक बाजारपेठ, रस्ते, गर्दीच्या ठिकाणी व प्रवासी वाहनांचे सॅनिटायझर करून स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे वाढणारा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला चांगले यश मिळाले असतानाच फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसागणिक रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यावर प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अंशतः लॉकडाऊन लागू करून विविध निर्बंध घातले आहेत. मात्र कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजनेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी होणारी स्वच्छता, सॅनिटायझर व प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे आदी महत्त्वपूर्ण बाबींना दुर्लक्षित करण्यात येत असल्याने वाढता संसर्ग रोखणार कसा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
ग्रामदक्षता समिती नावालाच
ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील मिळून ग्रामदक्षता समिती तयार करण्यात आली. परंतु तलाठी, ग्रामसेवक हे गावात फिरकत नसल्याने रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष घालून संबंधित ग्रामदक्षता समितीच्या सदस्यांना ग्रामीण भागात लक्ष घालून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली.