जयनगर : कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू झाली तेव्हापासून छोटे-मोठे व्यावसायिकांची उदरनिर्वाहासाठीच्या कसरतीची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. कारण कोरोना महामारीमुळे शासनाने संचारबंदी लागू केल्याने व्यावसायिकांना आपली दुकाने लावता येत नसल्याने उन्हाळी हंगामातील व्यवसाय उन्हाळा संपत आला तरी ठप्पच आहेत.
उन्हाळ्यात हंगामी व्यवसाय करणारे छोटे-मोठे व्यावसायिक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे खूपच अडचणीत आले आहेत. मार्च महिन्यापासून संचारबंदी लागू झाल्यामुळे त्यांना यावर्षी आपली दुकाने लावता आली नाहीत. पहिल्या लाटेत व्यावसायिकांचे आर्थिक गणित पार बिघडून गेले होते. तेव्हापासून त्यांना उदरनिर्वाहाकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. उन्हाळ्यात रसवंतीगृह, शीतपेयाची दुकाने तसेच गावोगावी फिरून आईस्क्रीम, कुल्फी विक्री करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून लॉकडाऊनची सुरूवात झाली होती. ऑक्टोबर महिन्यात रूग्ण संख्या कमी झाल्याने यावर्षी तरी उन्हाळ्यात आपल्याला दुकाने लावता येतील, अशी अपेक्षा व्यावसायिकांना होती. त्या अनुषंगाने अनेकांनी उन्हाळी हंगामाची जोरदार तयारी केली होती. काही व्यावसायिकांनी जानेवारी अखेरपासून आपली दुकाने चालू केली होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट जलद गतीने वाढू लागल्याने शासनाला संचारबंदी लावावी लागली. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही उन्हाळी हंगामातील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
फेब्रुवारी ते मे या चार महिन्यातील व्यवसायावर पुढील आठ महिन्यांची आर्थिक तजवीज करून ठेवतात. मात्र दुसऱ्या वर्षीही संचारबंदीत सतत वाढ होत असल्याने येणारे आठ महिने देखील उन्हाळी व्यावसायिकांसाठी पोट भरण्याकरिता जिकिरीचे जाणार आहेत. सध्या हे व्यावसायिक आपले पोट भरण्यासाठी शेतात वा इतरत्र ठिकाणी रोजंदारीने कामाला जाताना दिसून येत आहेत.
उन्हाळा म्हटला की, लग्नसराई असते. मात्र संचारबंदीमुळे कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पाडावयाचे असल्याने मंडपवाले, बॅण्डवाले, आचारी, पाण्याचे आर.ओ. मशिनवाले यांच्यावरही उन्हाळी व्यावसायिकांसोबत उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. संचारबंदीमुळे परिस्थिती बिकट निर्माण झाल्याने हे सगळे व्यवसायधारक रोजंदारीने कामाला जाताना दिसून येत आहेत.