नंदुरबार : कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन केले होते. या लॉकडाऊनची वर्षपूर्ती होत असताना कोरोनाच्या वेदनादायी आठवणींबरोबरच नव्याने सुरू झालेल्या कोरोनाच्या उद्रेकाने समाजमन चिंतीत झाले आहे. दिनांक ११ मार्च २०२१नंतर गेल्या १२ दिवसात रुग्णांची संख्या गेल्यावर्षाच्या तुलनेत रोज तीनपटीने वाढत असल्याने कोरोनाची भीती अधिकच वाढली आहे.
देशात मार्च २०२०मध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला जनता कर्फ्यू व त्यानंतर लॉकडाऊन जाहीर केले होते. जवळपास सहा महिने लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. गतिमान झालेले लोकजीवन थांबल्यासारखी अवस्था होती. पण सुरुवातीचे सहा महिने म्हणजे मार्च ते जुलै या दरम्यान जिल्ह्यातील वातावरण राज्यातील इतर भागांच्या तुलनेत काहीसे दिलासादायक होते. मार्च महिन्यात जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. पहिला रुग्ण १८ एप्रिल २०२० रोजी आढळल्यानंतर जिल्ह्यात जनमानसात भीतीचे वातावरण होते. पुढे २१ एप्रिल २०२०ला कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्याने लोकांमध्ये अधिकच भीती होती. पण राज्याच्या तुलनेत कोरोनाचे नवीन रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात दिलासादायक होते.
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात जनतेने अतिशय कडक नियम पाळले. आदिवासी भागात तर संबंधित गावातील लोकांनी बाहेरच्या व्यक्तिंना पूर्णत: गावबंदी केली होती. त्यासाठी स्वतंत्र पहारा देण्यासाठी युवकांचे पथक कार्यरत झाले होते. एवढेच नव्हे तर काही गावांनी अगदी दगड टाकून, काटे टाकून रस्तेच बंद केले होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रसार जिल्ह्यात झाला नाही. मात्र, जून २०२०नंतर हळूहळू प्रसार वाढला. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर रुग्णांनी उच्चांक गाठला होता. विशेषत: ऑगस्ट महिन्यात एक हजार ९६८ रुग्ण आढळले होते व सर्वाधिक म्हणजे ४८ जणांचा मृत्यू झाला होता. तर सप्टेंबर २०२०मध्ये दोन हजार ५५९ रुग्ण आढळले आणि ४० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मात्र पुन्हा जनजागृती आणि कायद्याचा बडगा सुरू झाल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात आली. अगदी फेब्रुवारी २०२१पर्यंत रुग्णांची संख्या बऱ्यापैकी नियंत्रणात होती. त्यामुळे सर्वकाही आलबेल झाल्यासारखे नागरिकांनीही सर्वच नियम धाब्यावर बसवले. प्रशासनानेही सवलत दिली. मात्र, १० मार्च २०२१नंतर मात्र कोरोना पुन्हा नियंत्रणाबाहेर गेला. याकाळात कोरोना चाचण्याही वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढू लागली. गेल्या मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ याकाळात फक्त २१ ऑगस्ट २०२०ला सर्वाधिक म्हणजे १९४ रुग्ण आढळले होते. मात्र, १२ मार्च २०२१पासून रोज २००पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यातही गेल्या आठवड्यात ३००चा टप्पा पार झाला तर २१ मार्चला रोजच्या रुग्णांनी ४००चा टप्पा पार केला. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे.
एकीकडे लॉकडाऊनला वर्षपूर्ती होत असल्याने त्याच्या वेदनादायी स्मृतींना विसरण्याचा प्रयत्न होत असताना, रुग्णसंख्या तीनपटीने वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.