तळोदा शहरात आठवडे बाजार दर शुक्रवारी भरतो. शहर व तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने आठवडा बाजार भरणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याबाबतची सूचना जाहीर फलकावर लावली होती व रिक्षावरदेखिल पालिकेकडून तसा संदेश नागरिकांपर्यत पोहोचविण्यात आला होता. असे असले तरी ग्रामीण भागातील नागरिक आठवडे बाजाराचा वार असल्याने शुक्रवारी मोठ्या प्रमाणात तळोदा शहरात दाखल झाल्याने ठिकठिकाणी गर्दी दिसून येत होती.
या पार्श्वभूमीवर तळोदा पालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावा यांनी शुक्रवारी स्मारक चौक, कपडा बाजार, सोनार बाजार, जुन्या पालिकेचा परिसर या भागात फिरून फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या, विनामास्क असणाऱ्यांवर कार्यवाही केली. त्यांच्यासोबत पालिकेचे प्रभारी कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र माळी, स्वच्छता निरीक्षक अश्विन परदेशी आदी कर्मचारी उपस्थित होते.
स्मारक चौकात ज्याठिकाणी आठवडे बाजार भरणार नसल्याचा सूचनाफलक लावण्यात आला होता. त्याठिकाणी सकाळी नेहमीप्रमाणे बाहेरगावाहून आठवडे बाजारात येणाऱ्या व्यावसायिकांनी फलकाच्या आजूबाजूला व रस्त्यावर दुकाने थाटल्याचे दिसून आले. वास्तविक याबाबतीत पालिकेकडून सकाळीच एकदा कर्मचारी वर्गाकडून कडक सूचना दिल्या पाहिजे होत्या. मात्र, कर्मचाऱ्यांकडून सूचना देवूनही मुख्याधिकाऱ्यांना फिरत असताना या भागातच नव्हे, तर सर्वत्र बाजार भरलेला दिसून आला.
महिलांच्या रोषाला जावे लागले सामोरे
तळोदा शहरात नेहमीप्रमाणे आठवडे बाजार भरला असताना मुख्याधिकारी सपना वसावा यांनी भन्साली प्लाझाजवळ असणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यांना भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी मुख्याधिकारी सपना वसावा यांना भाजीविक्रेते व दुकानदारांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आल्याने त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर दंडाची आकारणी केली. हे करत असताना त्यांनी भाजीपाला विक्रेत्या महिला दुकानदारांना अतिक्रमण हटविण्याबाबतदेखिल तोंडी सूचना दिल्या. हे करत असताना त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना भाजीपाला विक्रेत्यांचे भाजीपाल्याचे टोपले खाली उतरवायला लावले. यामुळे भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलांचा रोष मुख्याधिकारी यांनी ओढवून घेतला.
त्यामुळे मुख्याधिकारी नेमकी कारवाई कशाबाबत करीत आहेत, हेच दुकानदारांच्या लक्षात आले नाही. दुकानदारांकडून कारवाई करीत असताना आम्हाला अतिक्रमण हटविण्याबाबत पूर्वसूचना द्यायला हवी होती, असे वारंवार सांगण्यात येत होते. आठवडे बाजार भरणार नाही, अशा सूचना असतानाही दुकाने लावली, ती लावता येणार नाही. असेदेखिल कारवाई करत असताना मुख्याधिकारी वसावा यांच्याकडून सांगण्यात येत होते. मात्र, ही दुकाने दररोज नियमितपणे सुरू असणारी असून आठवडे बाजार निमित्ताने थाटल्या जाणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याऐवजी नियमित भाजीपाला विक्री करणाऱ्या दुकानांवर अशा प्रकारची कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या सर्व प्रकारांमुळे मुख्याधिकारी नेमकी कारवाई कशाबाबत करत आहेत, याबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था निर्माण झाली. या भागात नियमित भाजी विक्रेते दुकान थाटत असतात, जर पालिकेने सोशल डिस्टन्सिंगबद्दल कार्यवाही केली असेल तर मग नुसता दंड आकारू शकतात. मात्र, पालिका प्रशासनाकडून भाजीचे टोपले रस्त्यावर ठेवण्यात आल्याने नेमकी कार्यवाही कसली, सोशल डिस्टन्सिंगची की, आठवडे बाजार बंदची का अतिक्रमणाची असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आले.
आठवडे बाजार भरविण्यात येणार नाही, अशी सूचना ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात आली होती व स्मारक चौकात तसे फलकही लावण्यात आले होते. फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली व अतिक्रमण हटविण्याबाबत दुकानदारांना तोंडी सूचना देण्यात आल्या.
- सपना वसावा, मुख्याधिकारी, तळोदा नगरपालिका
भाजीपाला विक्रेत्यांच्या टोपल्या खाली उतरवू नका अशी विनंती केली. तरी पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी आमच्या टोपल्या खाली उतरवल्या. अतिक्रमणाबाबत आम्हाला पूर्वसूचना देण्याची गरज होती. इतर दुकानदारांचे अतिक्रमण आहे तर त्यांचा पण माल रस्त्यावर बाहेर टाकणार का, असा प्रश्न उपस्थित होतो.
-लताबाई भोई,भाजीपाला विक्रेत्या तळोदा.