रस्ता निर्मितीचे काम झाल्यानंतर रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण झाले किंवा नाही, हे तपासणीचे काम गुणवत्ता व नियंत्रण विभाग म्हणजेच क्वाॅलिटी कंट्रोल विभागाकडून करण्यात येते. ते तपासण्यासाठी कामात वापरलेल्या मुरूम, खडी डांबर यांचे नमुने घेतले जातात. त्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी विशिष्ट आकाराचे खड्डे तयार करून नमुने घेतले जातात. त्या नमुन्यांचा आधार घेत रस्त्याचा दर्जा निश्चित करण्यात येतो.
याचप्रकारचे नमुने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या तळोदा-प्रतापपूर-मालदा या रस्त्यावर ठिकठिकाणी घेण्यात आले. नमुन्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी साधारणत: एक ते सव्वा फुटाचे चौकोनी खड्डे तयार करून रस्त्याची गुणवत्ता तपाणसीसाठी नमुने घेतले गेले. रस्त्याच्या गुणवत्ता तपासणीसाठी क्वॉलिटी कंट्रोल विभागाने रस्त्याची गुणवत्ता तपासणी केल्याने नागरिकांनादेखील सुखद धक्का बसला. मात्र त्यानंतर क्वॉलिटी कंट्रोल विभागाने रस्त्याच्या गुणवत्ता तपासणीसाठी तयार केलेल्या या खड्ड्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांना नंतर मात्र या खड्ड्याचे धक्केच खावे लागत असल्याची स्थिती आहे.
रस्त्याचे नमुने घ्यायला तब्बल तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र या खड्ड्यांचा प्रशासनाला विसर पडला आहे. अद्याप हे खड्डे बुजविण्यात आले नसून, हे खड्डे वाहतुकीला अडसर ठरत आहेत. या खड्ड्यांतून घेतलेल्या नमुन्यांमध्ये नंतर फक्त खडी भरली असल्याने ती निघून एक सव्वा फूट चौरस व तीन-चार इंच खोल खड्डे झाले आहेत. वाहनधारकांच्या लक्षात हे खड्डे येत नसल्याने त्यात वाहने अडकली जातात. त्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत.
या समस्येकडे संबंधित विभागाने लक्ष घालून वाहतुकीस अडथडे ठरणारे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
हे खड्डे प्रथमदर्शनी लक्षात येत नाहीत. तब्बल तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील हे खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. - पन्नालाल पावरा, नागरिक, प्रतापपूर