गोगापूर ते कोचरा हा सात किलोमीटर अंतराचा रस्ता २००१ मध्ये तयार करण्यात आला होता. परंतु त्यानंतर दुरवस्था झाल्याने एकदाही डांबरीकरण झालेले नाही. या रस्त्याला दुसरा कोणताच पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना याच रस्त्याने जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. येथील शेतकरी व ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित विभागाकडे व लोकप्रतिनिधींकडे रस्त्यासंदर्भात तक्रारी करून रस्ता दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. परंतु या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले आहे.
सध्या खरीप हंगामाची तयारी जोमात सुरू आहे. शेतकऱ्यांना या मार्गावरून खताच्या गोण्या रस्त्याअभावी डोक्यावर घेऊन जाण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत जायला चांगला रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री जीव मुठीत घेऊन पायी जावे लागते. गोगापूरहून शेतकऱ्यांना शेतमाल खेतिया येथे मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता नसून गोगापूरहून कोचरापर्यंत पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते. या रस्त्याचे काम त्वरित झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा ब्राह्मणपुरी गणाचे पंचायत समिती सदस्य गणेश पाटील यांनी दिला आहे.
लोकप्रतिनिधींचा कानाडोळा
गेल्या अनेक वर्षांपासून गोगापूर येथील सरपंच व ग्रामस्थांकडून संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींकडे रस्ता दुरुस्तीची मागणी वारंवार करूनही कानाडोळा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून गोगापूर ते कोचरा रस्ता त्वरित दुरुस्ती करून शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गोगापूर ते कोचरा माता मंदिर सात किलोमीटर अंतराचा रस्ता २००१ मध्ये झाला आहे. त्यानंतर आजपर्यंत या रस्त्याची डागडुगीदेखील झालेली नाही. या रस्त्याबाबत जिल्हा परिषद व बांधकाम विभागाची एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरु आहे. हा रस्ता कोणत्याही विभागाच्या अखत्यारीत असो. मात्र त्याची दुरुस्ती किंवा नूतनीकरण होणे गरजेचे आहे. रस्त्याचे काम झाले नाही तर मी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे उपोषणाला बसेल.
-गणेश पाटील, पं.स. सदस्य, ब्राह्मणपुरी, ता. शहादा