जयनगर : कोरोना महामारीमुळे शासन आदेशान्वये अंगारकी चतुर्थीनिमित्त शहादा तालुक्यातील जयनगर येथील हेरंब गणेशाचे मंदिर दिवसभर बंद ठेवण्यात आले होते. पहाटे फक्त आरतीसाठी मंदिर उघडे करण्यात आले होते. नंतर सकाळपासून दिवसभर मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, म्हणून बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे दर्शनासाठी लोकांचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला. भक्तांनी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले.
संपूर्ण खान्देशात उजव्या सोंडेचा गणपती म्हणून जयनगर येथील हेरंब गणेशाचे देवस्थान प्रसिद्ध आहे. मात्र, या वर्षात दुसऱ्यांदा अंगारकी चतुर्थीचा योग आला असला, तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या अंगारकीलाही मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील व जिल्ह्यातील, तसेच परराज्यातून येणाऱ्या भक्तांचा हिरमोड झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टने मंदिर बंद राहील, असे जाहीर केले होते. त्यानुसार, ट्रस्टने मंदिर बंद ठेवले होते. मात्र, भक्तांचा संमिश्र प्रतिसाद दर्शनाला दिसून आला. यामुळे नारळ विक्रेते, फुलहार विक्रेते, तसेच गावातील व बाहेरून अभिषेक करण्यासाठी येणारे पुजारी यांना सलग दुसऱ्या अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद असल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.
दरवर्षी जयनगर येथे संपूर्ण जिल्ह्यासह मध्य प्रदेश, तसेच वडाळी, बामखेडा, कुकावल, कोठली, बोराळे, खैरवे, असलोद, मंदाणे, कोंढावळ गावांमधील शेकडोच्या संख्येने भाविक दरवर्षी अंगारकी चतुर्थीला दर्शनासाठी, तसेच नवदाम्पत्य अभिषेक करण्यासाठी आवर्जून येत असतात. मात्र, कोरोनामुळे शासन आदेशान्वये ट्रस्टने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे परिसरातील सर्व भक्तांना जयनगर येथे दर्शनासाठी येता आले नाही.
वर्षातील सलग दुसऱ्या अंगारकी चतुर्थीला जयनगर येथील हेरंब गणेश देवस्थान बंद ठेवण्यात आल्यामुळे गावातील, तसेच परिसरातील भक्तांचा हिरमोड झाला. शासनाने कोरोना काळात उत्सवाच्या दिवशी तरी नियम आखून देत, मंदिरे खुले करून भक्तांना दर्शन घेण्याची परवानगी द्यायला हवी. सलग दुसऱ्या अंगारकीला दुकानदारांना आर्थिक फटका सहन करावा लागला.
- भावराव शंकर माळी, विक्रेते, जयनगर.