वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागांतर्गत धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा आदी तालुके येतात. या वेळी कृषीपंपधारकांकडे वीजबिलापाेटी ५६४ कोटी थकबाकी असून, त्यात ७० कोटी विलंब आकार आहे. तसेच कृषीधोरण योजनेंतर्गत ५६४ पैकी ३४८ कोटी रुपयांचा भरणा करणे आवश्यक आहे. त्यातून तीन कोटी २३ लाख रुपयांचा भरणा शेतकऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर शहादा विभागांतर्गत १७ कोटी रुपयांची घरगुती व व्यावसायिकांकडे थकबाकी आहे. १५० कोटी पाणीपुरवठा व ६० कोटी स्ट्रीट लाइटचे वीजबिल थकीत आहे. वीजबिल वसूल व्हावे, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर बैठका आणि मार्गदर्शन मेळावे घेण्यात आले. वीजबिल भरणे सुलभ जावे, यासाठी महावितरणतर्फे हप्त्यांचीही योजना सुरू करण्यात आली होती. परंतु, या योजनेचा फायदा बहुतांश नागरिकांनी व शेतकऱ्यांनी घेतला नाही. शासन निर्णय होईल तो होईल, परंतु थकबाकीदारांनी आपले वीजबिल भरणे आवश्यक आहे. शासनाकडून निर्णय झाल्यास भरलेले बिल वजा केले जाईल. परंतु, तोपर्यंत वीजबिल थकवू नका, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी वीजबिलाचा भरणा केल्यास विद्युत रोहित्रासाठी ताटकळत राहावे लागणार नाही. शिवाय, पिकांनाही योग्य वेळी पाणीपुरवठा करण्यास मदत होईल. त्यामुळे वीजबिलांचा भरणा करून वीजकंपनीला सहकार्य करावे.
- के.डी. पावरा, अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, शहादा