नंदुरबार : बेरोजगारीमुळे अनेकांचे विवाह लांबण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरी नसल्याने छोकरी मिळत नसल्याने अनेक जण घरात बसून आहेत. छोटी-मोठी का, होईना नोकरीच हवी, या अपेक्षेने मुली विवाहासाठी होकार देत आहेत. यामुळे नोकरी नसलेल्यांचा यंदाही हिरमोड झाल्याचे चित्र आहे.
यात कोरोना अधिक परिणामकारक ठरला असून ज्यांच्या हाती रोजगार होता तेही बेरोजगार झाले होते. यातून हातात पैसा नसल्याने विवाहासारखे निर्णय नाईलाजाने पुढे ढकलण्याची वेळ त्यांच्यावर आले आहे. यातून कमी खर्चातील नोंदणी विवाहही कमी झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
नंदुरबार येथील दुय्यम निबंधक कार्यालयात वर्षभरात साधारण २० ते २२ विवाह नोंदणी पद्धतीने होतात.
कोरोनामुळे या संख्येत काही अंशी फरक पडला आहे. परंतू अनेक जण आजही नोंदणी विवाह करण्यास पसंती देत आहेत.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात विवाह सोहळ्यांना ब्रेक लागला आहे. सोबत मुली पाहण्याचे कार्यक्रमही थांबले आहेत. बेरोजगारीने अनेकांना चटका दिला असून दीड वर्षांपासून विवाह थांबले आहेत. मुली नोकरीची अपेक्षा करत असल्याने अनेकांचे विवाह यंदाही झालेले नाहीत.
- प्रवीण पाटील, नंदुरबार
आधीच खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करतो, म्हणून लोक मुली देत नव्हते. कोरोनामुळे गत दीड वर्षात लाॅकडाऊनमुळे साठवलेला पैसा कामी आला. आता व्यवसाय चालत नाही. नव्याने सर्व काही सुरळीत करतो आहे. परंतू मुली देणारे नोकरी विचारतात, व्यवसायाला किंमत देत नाहीत.
-युवक, नंदुरबार.
मुला-मुलींचे वय वाढत असल्याने चिंता
सरकारी नोकरी नसल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील युवक मिळेल त्या नोकऱ्यांकडे वळत आहेत. कुशल आणि अकुशल अशा श्रेणीतील कामे करुन रोजगार कमावण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात नोकरी न मिळाल्यास लगतच्या गुजरात राज्यातील मोठ्या शहरांची वाट युवक धरु लागले आहेत. यात अनेकांचे वय हे लग्नाचे आहे. परंतु योग्य स्थळ मिळत नसल्याने त्यांचे विवाह लांबणीवर पडत आहेत. दुसरीकडे मुली शिक्षित असताना योग्य तो जोडीदार मिळत नसल्याने पालक चिंतेत आहेत. महागाईच्या काळात मुलीचा संसार चांगला व्हावा या अपेक्षेने पालक स्थळांचा शोध घेत आहेत. यासाठी प्रामुख्याने सोशल मीडियाचा आधार घेण्यावर काही जण भर देत आहेत.