चिंचपाडा गावाला चार जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. या चारही जलकुंभांना दिलेल्या वीज जोडणीचे सुमारे दोन लाख रुपयांपेक्षा जास्त वीज बिल थकीत झाले आहे. वीज बिल थकल्याने चारही जलकुंभांचा वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे. पाणीपुरवठा ठप्प झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. ग्रामपंचायतीने वीज कंपनीला ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र हा धनादेश घेण्यास नकार देत वीज कंपनीने संपूर्ण वीज बिल भरावे, असे सांगण्यात आल्याने समजते. चिंचपाडा गावाची लोकसंख्या साडेहजारांच्या आसपास आहे. पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद झाल्याने ग्रामस्थांचे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी हाल होत आहेत. गावात इतरही ग्राहकांकडे वीज बिल थकल्याने वीज वितरण कंपनीतर्फे सहायक अभियंता अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दानिअल गावीत व त्यांचे सहकारी वीज बिल वसुलीसाठी प्रयत्न करीत आहेत.
वीज बिल थकल्याने चिंचपाड्याचा पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST