लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : राजविहीर, खुषगव्हाण व रोझवा पुनर्वसन या तीन गावांमधील बालस्नेही पंचायती उपक्रमास गेल्यावर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदापासून तळोदा तालुक्यातील 67 व धडगाव तालुक्यातील 10 असे 77 ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. समन्वयकांमार्फत गावात व प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये बालसभा घेऊन विद्याथ्र्याना पंचायतीच्या प्रत्यक्ष कामकाजाची माहिती, नेतृत्वाचे धडे दिले जात आहेत. मुलेही या उपक्रमात उत्साहाने सहभागी होत आहेत.गावाच्या विकासासाठी माहितीबरोबरच ती कामे कशी राबवायची, या कामांमध्ये सक्रीय सहभाग घेऊन मुलांमध्ये नेतृत्व गुण निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने गेल्यावर्षी राज्यात बालस्नेही ग्रामपंचायती हा अत्यंत चांगला उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. या उपक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला होता. त्यातही जिल्ह्यातून तळोदा तालुक्याची निवड करून राजविहीर, खुषगव्हाण व रोझवा पुनर्वसन अशा तीन पंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला होता. तिन्ही गावांमधील पंचायतींच्या सदस्य संख्येनुसार मुला-मुलींची सदस्य म्हणून निवड करून पंचायतींमध्येच त्यासाठी स्वतंत्र बालपंचायत स्थापन करण्यात आली होती. तेथूनच हे बालसदस्य आपल्या गावाचा कारभार चालवून विकास कामे, योजनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत असत. साहजिकच त्यांच्या सक्रीय सहभागामुळे गावातील गटबाजी कमी होऊन कामांमध्येही पारदर्शकता आल्याचे येथील ग्रामपंचायतींचे प्रशासन सांगतात. राजविहीर ग्रामपंचातीच्या एका बालसदस्याने औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या कार्यशाळेत आपण बालस्नेही ग्रामपंचायत वर्षभर कशी हाताळली याचे सुंदर सादरीकरण केले होते. या तिन्ही ग्रामपंचायतींमधील बालस्नेही पंचायतींना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर जिल्ह्यातून तळोदा व धडगाव या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. त्यातही तळोदा तालुक्यातील 67 व धडगाव तालुक्यातील 10 अशा 77 गावांमध्ये यंदापासून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तळोदा तालुक्ययातील बोरद, मोदलपाडा, प्रतापपूर, मोड, रांझणी, अमोनी, चिनोदा, राणीपूर, धनपूर अशा प्रमुख ग्रामपंचायतींचा समावेश आहे. उपक्रमाची माहिती देण्यासाठी पाच समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे स्वयंसेवक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये बालसभा घेत आहेत. बालसभांमधून ते प्रत्यक्ष ग्रामपंचायतींची कामे, सदस्य संख्या, बालहक्क, विकास हक्क, संरक्षक हक्क व सहभागाचा हक्क याविषयी मार्गदर्शन करीत आहेत. पहिल्या टप्प्यात बालसभा झाल्यानंतर दुस:या टप्प्यात प्रत्यक्ष पदाधिका:यांची निवड करून कमिटींची स्थापना केली जाणार आहे. आतापावेतो समन्वयकांमार्फत या दोन्ही तालुक्यांमधून 50 बालसभा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
बालस्नेही पंचायतीत तळवे ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील माध्यमिक विद्यालयात बुधवारी बालसभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नीमेश सूर्यवंशी होते. या वेळी प्रभाग समन्वयक पूनम पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी बालस्नेही पंचायतीविषयी विद्याथ्र्याना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, बालकांनी आपल्या हक्कांची जाणीव करून घेतली पाहिजे. या बालसभेनंतर प्रत्यक्ष बालपंचायतींची निवड केली जाणणार आहे. त्यातून मुलांचे नेतृत्व गुण पुढे येणार आहेत. अशोक वसावे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राम सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास वसंत मराठे, एस.एल. महाजन, साहेबराव पाटील, गजेंद्र गोसावी, देवीदास मराठे, आर.बी. पवार, अनिल माळी, अनिल इंदीस, अनिल टवाळे, संजय तनपुरे, गजानन माळी, धनराज केदार, आकाश महाजन उपस्थित होते.