महागाईमुळे गृहिणींना स्वयंपाक करताना तेलासाठी हात अखडता घ्यावा लागत असल्याने याचा परिणाम स्वयंपाकावर दिसून येत होता. पूर्वीचे रुचकर पदार्थ कमी झाले होते. आता तर तेलाचे दर काही प्रमाणात का होईना कमी झाले आहेत, त्यामुळे गृहिणींच्या चेहऱ्यावर सुखद हास्य दिसत आहे.
पूर्वी सूर्यफुलाची लागवड करीत होतो; परंतु सूर्यफुलाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्याची राखण करणे खूप महत्त्वाचे असते. कारण पक्षी या पिकाची हानी करतात. पूर्वी कुटुंब एकत्र येऊन अशी शेती करायचे. त्यामुळे पीक राखणीसाठी मदत व्हायची. या पिकासाठी श्रम जास्त आणि उत्पन्न कमी म्हणून सूर्यफुलाची शेती करणे बंद केले आहे.
-संजय धनराज मराठे, शेतकरी, ब्राह्मणपुरी, ता. शहादा
तेल उत्पादकांच्या मते जिल्ह्यातील शेंगदाणा, सूर्यफुलाचे उत्पादन गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात घटले आहे. कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने तेल उद्योगही बंद पडले आहेत. या उत्पादनांना प्रोत्साहन दिल्यास तेलाचे दर नियंत्रणात येऊ शकतात.
-संतोष फकिरा पाटील, शेतकरी, सुलतानपूर, ता.शहादा
गृहिणींचे बजेट कोलमडले
गेल्या वर्षीपासून हळूहळू तेलाचे भाव गगनाला भिडत चालले होते. त्यातच सोयाबीन तेल फिल्टर होऊन येत असल्याचे बोलले जात असले तरी कोणत्या ब्रॅण्डचे किती शुद्ध तेल येते यावरही विचार केला जात आहे. एकंदरीत महागाईचा भडका सामान्यांच्या आवाक्यात नाही हे स्पष्ट असले तरी शेवटी जगण्याची उमेद कोण सोडेल आणि सोडणार तरी कशी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला होता. आता काही प्रमाणात खाद्यतेलाचे भाव घटल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.
खाद्यतेलाचे दर (प्रतिकिलो)
आधीचे आताचे
सोयाबीन- १६५ १४०
शेंगदाणा - १८५ १६५
सूर्यफूल - १७५ १७२
पामतेल - १५५ १२७