लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आपण किंवा आपल्या कुटूंबातील कुणीही काँग्रेस पक्ष सोडणार नाही. पक्ष बदलाच्या अफवा असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. विविध कामांसंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रघुवंशी बोलत होते. काँग्रेस सोडून अनेकजण भाजपमध्ये जात असल्याबाबत बोलतांना त्यांनी सांगितले. काँग्रेसला एक परंपरा आहे. आजही काँग्रेसला मानणारी लोकं जिल्ह्यात आहेत. आपले मुळ हे काँग्रेस आहे. त्यामुळे आपण किंवा आपल्या घरातील सदस्य काँग्रेस सोडण्याचा विचारही मनात आणू शकत नाही असेही त्यांनी सांगितले. भाजपमध्ये अनेकांशी आणि खुद्द मुख्यमंत्री यांच्याशी आपले चांगले संबध आहेत. याचा अर्थ पक्ष प्रवेश होईल असा नाही. दरम्यान, भरत माणिकराव गावीत यांनी भाजपत जाण्याचा घेतलेला निर्णय हा दुर्दैवी आहे. त्यांचा हा निर्णय गावीत कुटूंबियांच्या वलयाला आणि प्रतिष्ठेला नक्कीच धक्कादायक असल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्ष बदलाचा विचार स्वप्नातही येणार नाही- चंद्रकांत रघुवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:01 IST