नंदुरबार : जिल्ह्यात १ मेपर्यंत तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पक्क असलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहनही कृषी विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषी हवामान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
कृषी विज्ञान केंद्राच्या पत्रकानुसार, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजनुसार, २८ एप्रिल ते १ मे दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. वादळामुळे हवेचा वेग हा ३० ते ४० किलोमीटर प्रति तास असा राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. काढणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावीत. वादळी वाऱ्यापासून संरक्षणासाठी भाजीपाला, मिरची, पपई, केळी आदी पिकांना आधार देण्याची व्यवस्था करावी. पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. पथारीवर वाळत ठेवलेली मिरची सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावी, असे आवाहनही कृषी हवामान सल्ला माहिती, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र यांनी केले आहे.