प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार रात्री १० वाजेच्या सुमारास विजापूर गावात बाबूराव गावित यांच्या शेतातील साडेचार एकर मधील अडीच एकरामध्ये उसाला आग लागल्याने ऊस जळून खाक झाला. आग लागताच परिसरातील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु हवेचा वेग जास्त असल्याने आग झपाट्याने पसरली. प्रल्हाद गावित यांनी तात्काळ नवापूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला संपर्क करून पाचारण करण्यात आले. घटनास्थळी अग्निशामक बंब दाखल झाल्याने तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु आगीत अडीच एकर ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत नवापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सकाळी तलाठी व पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. साधारण दोन लाखाचे नुकसान झाल्याचे पंचनामाचा शासकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. महसूल प्रशासनाने शेतकरी बाबुराव गावित यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
विजापूर येथे अडीच एकर ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:28 IST