आठशे लोकवस्तीच्या या गावातील निम्मा गाव साथीच्या आजाराने हैराण झाला. शेवटी गावातील डॉ. नीलेश वळवी यांना गावकऱ्यांनी बोलावले आणि तंबू ठोकून इथेच तात्पुरते रुग्णालय सुरू केले. आता या गावातीलच नाही तर गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील १४-१५ गावांमधील ९०० हून अधिक टाईफाईडच्या रुग्णांना गेल्या गेल्या १५ दिवसात या ठिकाणी उपचार केल्याचे ते सांगतात. यासाठी त्यांची टायफाईडची चाचणी केली जाते, कोविडची चाचणी मात्र केली जात नाही. अन्यत्र कोविडच्या चाचणीशिवाय प्रवेश नाही, त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्यांची संंख्या वाढली आहे. गुजरातमधील सायला, मोग्रणी, टाकली, वडिली, भिलभवाली, नासेरपूर, मोगलीपाडा या निझर तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील नंदुरबारमधील पिपलोद, भवाली, शिवपूर, लोय, धानोरा गावचे शेकडो रुग्ण या ठिकाणी येथे आहेत. गावकऱ्यांनी उभारलेल्या मंडपासह प्रत्येकाच्या घरापुढील मंडपात रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे चित्र दिसते. अनेक जण झाडाला सलाईन अडकवून झाडाखाली बसून असलेले दिसले. एकाच कुटुंबातील अनेक जणांवर एकत्र उपचार घेताना भेटले.
खाट घेऊन या आणि सलाईन लावून जा...
एकेका कुटुंबातील तीन-चार सदस्यही येथे उपचार घेत आहेत. येणाऱ्याने आपली खाट घेऊन यायची हीच अट. त्यामुळे एकच रुग्ण असलेले आणि चारचाकी नसलेले दुचाकीवर आपापली खाट घेऊन येथे येत आहेत. सकाळी ११ ते रात्री ११ असा १२ तास हा दवाखाना चालतो. तीन दिवसांचे एका रुग्णाकडून उपचाराचे १,८०० रुपये घेतले जातात. त्यात त्यांना इंजेक्शन, तीन सलाईन लावले जातात. गेल्या १५ दिवसात एकही रुग्ण दगावला नाही. अशाप्रकारे ९०० हून अधिक रुग्णांनी या ठिकाणी उपचार घेतल्याचे स्थानिक सांगतात.