ब्राह्मणपुरी : मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीने सर्व सोहळे, कार्यक्रम रद्द; तर कुठे साध्या पद्धतीने करण्याची वेळ आली होती. आता पुन्हा शहरी भागासह ग्रामीण भागांतही कोरोनाची भीती वाढली असताना व प्रशासनाकडून विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे सद्य:स्थितीत सुरू असलेल्या विवाह सोहळ्यातील वधूपित्याला मात्र चिंता लागली असून, त्यांचा जीव टांगणीला लागला असल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोनाकाळात टाळेबंदीमुळे अनेक लग्नसोहळे रद्द झाले. लग्नासाठी करण्यात आलेल्या सर्व तयारीवर पाणी फिरले. सगळी हौस, उत्साह बाजूला ठेवून ठरलेली लग्नतिथीही टळली. यामुळे वधू-वरासह सर्वच नाराज झाले. त्यातच काही वधूपित्यांना आपल्या मुलीचा विवाह सोहळा धूमधडाक्यात व्हावा ही मनोमन इच्छा होती; परंतु कोरोनामुळे काहीच जमले नाही. ठरलेल्या तिथी पुढे ढकलण्यात आल्या. दिवाळीनंतर यातील बरेच लग्नसोहळे उरकून घेण्यात आले. उर्वरित लग्नकार्य आता पुन्हा सुरू होताच मागील आठवड्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने प्रशासनाच्या वतीने अनेक नियम व निर्बंध घालण्यात येत आहेत. त्यात पुन्हा मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर, जमावबंदी टाळणे यांसह रात्रीचे घालण्यात आलेले निर्बंध यांमुळे पुन्हा एकदा नियोजित विवाह सोहळ्याच्या वधूपित्याचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच आता फेब्रुवारी व मार्चमध्ये असलेल्या लग्नतिथी व विविध कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने संकट निर्माण झाले आहे. यामुळे वर्षभराच्या कालावधीत पुन्हा कोरोनामुळे वधूपित्यांसह अनेकांचा जीव टांगणीला लागला असून, सर्वसामान्यांना पुन्हा लॉकडाऊन लागून घरी बसावे लागणार की काय, असा प्रश्न आहे.
ऐन लग्नसोहळ्यात कोरोनाची धास्ती
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची धास्ती लग्नसोहळ्यात कमी झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे नागरिकांच्या दुर्लक्षामुळे मास्क वापरणे बंद झाले. परिणामी कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने नाइलाजाने प्रशासनाला लग्नसोहळ्यासह इतर कार्यक्रमांत निर्बंध लावण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.