लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा तीन महिन्यापासून बंद आहेत. त्या कधी सुरू होतील हे अनिश्चित असले तरी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहे. तसे नियोजनही शिक्षण विभागातर्फे सुरू आहे.शहादा तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या यु-डायसच्या मागणीनुसार ५६ हजार ७७७ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. बालभारतीकडून ६५ टक्क्यांपर्यंत पुस्तके प्राप्त झाली असून, उर्वरित लवकरच प्राप्त होणार असल्याचे गट शिक्षणाधिकारी उषा पेंढारकर यांनी सांगितले.समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येतात. यावर्षी कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे पुस्तके प्राप्त होतात की नाही या विवंचनेत पालक व शिक्षक होते. मात्र बालभारतीने पुस्तकांची छपाई पूर्ण केल्याने सर्वांची चिंता मिटली.शहादा तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाचा अनुदानित शाळेतील यु-डायस संख्येनुसार ५३ हजार २३० मराठी माध्यम व तीन हजार ५४७ उर्दू माध्यम असे, एकूण ५६ हजार ७७७ पुस्तकांच्या संचांची मागणी होती. त्यानुसार तालुक्याला पहिल्या फेरीत ६५ टक्के पुस्तकांचे संच प्राप्त आहेत. त्यात इयत्ता पहिलीचे चौथीपर्यंत पूर्ण प्राप्त असून, सहावी ते आठवीपर्यंतचे ५० टक्के संच प्राप्त आहेत. अद्याप उर्दू व सेमी इंग्रजीचे संच अप्राप्त असून, तेही लवकरच प्राप्त होतील.शासन निर्णयानुसार सर्व माध्यमाचा व व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांनाच पुस्तके देय आहेत. विनाअनुदानित शाळांना पुस्तके देय नाहीत. पुस्तक वाटप करताना शासनाच्या कोरोनाविषयी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला जाणार आहे. शाळा कधीही सुरू होवोत. परंतु नवीन पुस्तके देवूनच विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. पुस्तक वाटपाचे नियोजना वेळी शिक्षण विस्तार अधिकारी एस.एस. तावडे, टी.डी. वळवी, केंद्रप्रमुख एस.इ. ईशी, एस.एस. अहिरे, विषय तज्ञ उपस्थित होते.
पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:30 IST