शहादा : अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वयंशिस्तीची जाणीव व्हावी, नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी येथील तहसील कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात आले आहे. तहसीलदारांपासून ते थेट शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत साऱ्यांचीच हजेरी या बायोमेट्रिक यंत्राद्वारे सुरू करण्यात आली आहे. परिणामी प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढेल तर दांडी बहाद्दरांना निश्चितच पूर्णवेळ थांबावे लागणार आहे.
शासकीय कार्यालय म्हटलं म्हणजे साहेब एवढ्यात होते, तुम्ही यायच्या अगोदरच जेवायला गेले आहेत आता येतीलच, मिटींगला गेलेत, पंचनाम्यासाठी ग्रामीण भागात आहेत हे सगळे परवलीचे शब्द ग्रामीण भागातून कार्यालयात कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या कानी पडतात. त्यामुळे नागरिकांचे एका खेपेत काम होणे म्हणजे दुर्लभच. येथील तहसील कार्यालय हे शहरापासून काही अंतरावर असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना बसस्थानकापासून रिक्षा करुन कार्यालयात जावे लागते. साहजिकच वेळेवर संबंधित अधिकारी, कर्मचारी कार्यालयात न मिळाल्यास काम तर होतच नाही शिवाय वेळ व पैसाही खर्च होतो. तहसील कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी यंत्र लावल्याने कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती व कामकाजाला निश्चितच गती प्राप्त होईल. साहजिकच प्रशासनातील मुख्य अधिकाऱ्यांना कोण कर्मचारी कामावर आहेत व कोण रजेवर आहेत, याची इत्यंभूत माहितीही मिळेल. शिवाय कामकाजात गती येऊन जनतेची कामेसुद्धा वेळेवर होण्यास मदत होईल. सध्या घरकुले, संजय गांधी, रेशनकार्ड, जमीन व्यवहार अशा वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांची वर्दळ तहसील कार्यालयात असते. अधिकारी किंवा कर्मचारी जागेवर नसल्यास लाभार्थ्यांच्या पदरी निराशा येते. अर्थात अधिकारी जिल्हा मुख्यालयात बैठकीसाठी अथवा कामासाठी गेले तर त्यादिवशी बहुतेक ठिकाणी काही कर्मचारी टेबलावर हजर नसतात, असा आरोप ग्रामस्थांकडून होतो तर काही कर्मचारी कार्यालय सुटण्याच्या आधीच म्हणजे पाच वाजेपर्यंतच निघून जात असल्याचे नागरिक सांगतात. आता बायोमेट्रिक हजेरीमुळे कार्यालयाबाहेर काही शासकीय काम नसल्यास पूर्णवेळ अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतील व नागरिकांचे काम यामुळे सुकर होईल.