सातपुडा डोंगररांगेतील दळण वळणाच्या विकासापूर्वी शहादा ते धडगाव रस्त्यावर दोनच पूल होते. त्यावेळी ॲड. पाडवी यांना स्वतः प्राथमिक शिक्षणापासून ते १२ वीपर्यंतच्या शिक्षणासाठी शहरी भागात जाताना असली, अस्तंबा, नकट्यादेव, गोऱ्यामाळ, रापापूर या मार्गाने तळोदापर्यंत पायवाटेने पायी चालत जावे लागत होते. याची जाणीव ठेऊन त्यांनी आमदार झाल्यानंतर शहाद्यासह धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील रस्ते आणि ३५० ते ४०० लहान मोठे पूल तयार केले व खऱ्या अर्थाने सातपुड्यातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.
नर्मदा नदीचा काठावरील गावपाड्यांना मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे तयार केले. तळोदा, कोठार, चांदसैली, धडगाव रस्ता कामाची सुरुवात करून या भागासाठी ॲड.पाडवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
असली व जुना अस्तंभा तसेच इतर भागातील गाव पाड्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचता यावे यासाठी रस्ते व पूल उभारले. मात्र असली गावापासून जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी शहादा, कोठार, अक्कलकुवामार्गे वळसा घालून यावे लागते आणि त्यात अधिक वेळ लागतो. नकट्यादेव रस्ता हा अक्कलकुवा, धडगाव व तळोदा या तीन तालुक्याना जोडणारा रस्ता ठरावा आणि या भागातील ग्रामस्थांना एका तासातच जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचता यावे व एका दिवसात आपली कामे करून परत घरी पोहोचता यावे, असा पालकमंत्री ॲड.पाडवी यांचा प्रयत्न असून, या रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होत आहे. ४० वर्षांपूर्वी सातपुड्यातील मुलं शिक्षणासाठी ज्या रस्त्याने बाहेर पडली त्या रस्त्याच्या निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक असलेले ॲड.पाडवी यांच्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण असणार आहे.