सुनील सोमवंशी।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात झालेली मेगा भरती आणि निवडणुकीनंतर राज्यात झालेले सत्तांतर यामुळे अनेक आयाराम गयाराम यांची आता पंचाईत झाली असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत 'जो देगा उसका भला' या उक्तीप्रमाणे ज्या पक्षाकडून तिकीट मिळेल त्या पक्षाकडून लढण्याची मानसिकता उमेदवारांची असल्याने कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून उमेदवारी लढवेल याबाबत तालुक्यात संभ्रम कायम आहे.नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुका मोठा असून, १४ गट आणि २८ गण असलेल्या या तालुक्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शहादा तालुक्यातही मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात मेगा भरती झाली होती. या मेगा भरतीमुळे आधीच पक्षात असलेल्या तटा-गटात पुन्हा वाढ होऊन नव्या जुन्यांचा नवा वाद पुढे आला. पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विधानसभेपूर्वी भारतीय जनता पक्षात दाखल झालेल्या नेत्यांची आता मात्र पंचायत झाली आहे. पूर्वी भारतीय जनता पक्षाचा एक खांबी तंबू होता. आता मात्र चार वेगवेगळ्या खांबावर हा तंबु असल्याने पक्षांतर्गत डोकेदुखी वाढली आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी शहादा तालुक्यातही काँग्रेस-राष्ट्रवादीतुन भाजपात मेगा भरती झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील, काँग्रेसचे जिल्हा जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जयपाल रावल हे चौघेही नेते भाजपवासी झाले होते. तालुक्यातील या चारही मोठ्या आणि दिग्गज नेत्यांमुळे भाजपची ताकद वाढली असली तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात आता चुरस निर्माण झाली आहे.तालुक्यात १४ गटांपैकी फक्त चार गट इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असल्याने या चारही गटात विशेषत: मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. या चार गटांपैकी लोणखेडा व कहाटुळ हे दोन गट महिलांसाठी राखीव असल्याने केवळ म्हसावद व पाडळदा हेच दोनच गट इतर मागासवर्गीयांसाठी पुरूष उमेदवारांसाठी असल्यामुळे या दोन गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची कसरत लागणार आहे. फक्त भाजपचाच विचार केला तर 'गट दो और आदमी चार' अशी स्थिती असल्याने कोणाला तिकीट मिळेल व कोण रिंगणाबाहेर राहिल यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. केवळ भाजपाच नव्हे तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांमध्येही या दोन गटातील उमेदवारीसाठी चढाओढ राहणार आहे.पक्षनिष्ठा वगैरे काहीही न बाळगता तिकीट मिळेल त्या पक्षाकडे जाण्याचा प्रघात विधानसभा निवडणुकीपूर्वी पडल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही 'जो देगा उसका भला' याप्रमाणे उमेदवारांची मानसिकता असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मेगा भरतीत दाखल झालेल्या नेत्यांपैकी काही नेते पुन्हा घरवापसी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळेच उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्यापही कोणत्याही मोठ्या उमेदवारांनी उमेदवारी दाखल न केल्याने आपला नेता कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करतो आणि आपल्याला कोणत्या पक्षाचा प्रचार करावा लागेल या संभ्रमात त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत. एकंदरीतच शहादा तालुक्यात अजूनही राजकीय वातावरण संभ्रमाचे असल्याकारणाने निवडणुकीचा पाहिजे तेवढा फिवर तालुक्यात चढलेला नाही.शहादा तालुक्यात २८ गणांपैकी चांदसैली व ब्राह्मणपुरी हे केवळ दोन गण जनरल असून, सुलतानपुर, खेडदिगर, मंदाणे, डोंगरगांव, मोहिदे त.श., पाडळदे बु., जावदे त.बो., आणि शेल्टी हे आठ गण इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आहे. यात एक जनरल व चार ओबीसी गण महिलांसाठी राखीव असल्याने उर्वरित पाच जागांसाठीच्या तिकिटासाठी ओबीसी आणि जनरल पुरुष उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. या निवडणुकीत महिला उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे. शहादा तालुक्यातील १४ गटांपैकी तब्बल दहा गट तर २८ गणांपैकी तब्बल १४ गण महिलांसाठी राखीव आहेत.१४ गट- कन्साई, सुलतानपुर, म्हसावद, खेडदिगर, मंदाणे, चांदसैली, लोणखेडा, कुढावद, पाडळदे बु, सारंगखेडा, कहाटुळ, वडाळी, मोहिदा त.श., प्रकाशा२८ गण- कन्साई, राणीपुर, सुलतानपुर, सुलवाडे, म्हसावद, तलावडी, खेडदिगर, ब्राह्मणपुरी, मंदाणे, वडगांव, चांदसैली, कोंडावळ, लोणखेडा, डोंगरगांव, कुढावद, मोहिदे त.श., पाडळदे बु., जावदे त.बो., सारंगखेडा, अनरद, कहाटुळ, कळंबु, वडाळी, तोरखेडा, मोहिदा त.श., वैजाली, प्रकाशा, शेल्टी.एकूण मतदार - दोन लाख ५१ हजार १७६एकूण गावे - १८३
आयाराम गयारामची पंचाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 13:06 IST