कॅशबुकात खर्च नोंद करताना कोणत्या कामावर किती खर्च झाला याच बऱ्याच ठिकाणी उल्लेख नव्हता, आर्थिक व्यवहार दैनंदिन लिहिताना सरपंच, प्रशासक, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या सह्याच नसल्याचे निदर्शनास आले होते. बहुतांश ठिकाणी कोणत्या कामासाठी खर्च करण्यात येत आहे, याचीही नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरात करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतींच्या दैनंदिन तसेच निधी वापराची नोंदी असलेल्या कॅशबुकच गायब असल्याने गैरव्यवहार सिद्ध होणार कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
या चार वर्षांच्या काळात करण्यात आलेल्या खर्चासाठी ग्रामसभा, मासिक सभा यांचीही मंजुरी नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीत चालणाऱ्या एककलमी कार्यक्रमाची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे. या प्रकरणाचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत असतानाही जिल्हा परिषद प्रशासन वेळखाऊ भूमिका घेत असल्याचा आरोप करत अक्कलकुवा येथील आजी-माजी पदाधिकारी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. दरम्यान या प्रकरणाचा अहवाल नाशिक येथील विभागीय आयुक्त यांच्याकडून पाठवण्यात आला होता. तेथून नेमके काय आदेश आले की, किंवा कारवाई झाली याचाही उलगडा करण्यात आलेला नसल्याने २२ फेब्रुवारी रोजीच्या निर्णयाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.