आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत तळोदा तालुक्यातील राणीपूर येथील माध्यमिक आश्रमशाळा नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, माजी मंत्री पद्माकर वळवी, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा, तहसीलदार गिरीश वखारे आदी उपस्थित होते.
ॲड. पाडवी म्हणाले, शैक्षणिक विकासाबरोबर समाजाचा विकासही महत्वाचा आहे आणि त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक आहे. आदिवासी विभागातर्फे आश्रमशाळेसाठी ५५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना चांगला गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात येत आहे. पालकांनी आश्रमशाळेतील सुविधांचा विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा यासाठी मुलांना अधिकाधिक शिक्षण घेऊ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. मागच्या पिढीने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. त्या तुलनेत आज चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा उपयोग करून शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाचे ध्येय गाठावे. अडीच ते सहा वयोगटातील मुलांसाठी आश्रमशाळेत नर्सरीची सुविधा आणि पहिली ते पाचवीतील शिक्षण इंग्रजीतून देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. राणीपूर येथे मुलांच्या वसतिगृहालाही मंजुरी देण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले. नकट्यादेव ते गोऱ्यामाळ या १३ कोटी खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
ॲड. वळवी म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन बदलत्या काळानुसार नवे तंत्र आत्मसात करावे. नव्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. यातून गुणवत्ता वाढीला चालना मिळेल. शिक्षकांनी नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करावे. आमदार पाडवी म्हणाले, आश्रमशाळेमुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल. संगणकीय सुविधेचा लाभ घेऊन चांगले अधिकारी घडतील. पालकांनी आपली मुले शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. भारुड म्हणाले, नऊ कोटी खर्च करून ही सुसज्ज इमारत तयार करण्यात आली आहे. आश्रमशाळेच्या माध्यमातून चांगले इंजिनिअर, डॉक्टर आणि अधिकारी घडावे असे प्रयत्न आहेत. विद्यार्थ्यांनी चिकाटीने प्रगतीचा ध्यास करावा व मिळालेल्या संधीचे सोने करावे. माजी मंत्री वळवी यांनी स्पर्धेच्या युगात टिकणारा विद्यार्थी घडविण्यासाठी आश्रमशाळेतील सुविधा उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला.
प्रास्ताविकात पंडा म्हणाले तळोदा प्रकल्पातंर्गत आठ आश्रमशाळा इमारतींना मंजूरी मिळाली असून आणखी पाच इमारतींना मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. राणीपूर आश्रमशाळेत प्रयोगशाळेसह ११ वर्गखोल्या, संगणक कक्ष, आणि मुलींचे वसतिगृह आहे. या सुविधेचा विद्यार्थ्यांना लाभ होईल.