याबाबत तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, आदिवासी बांधव आणि व्यापारी यांनी कोविड नियमांचे पालन करून खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्यास कोणतीही अडचण नाही. आमचूरमुळे तालुक्यातील अर्थकारण वेगात सुरू राहणार असल्याने प्रशासनही आदिवासी बांधवांना मदतच करणार आहे.
भोगवाडे येथील सुखदेव पावरा यांनी सांगितले की, सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील धडगाव व मोलगी परिसरात आमचूर प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, लाॅकडाऊनमुळे आमचूरला भाव कमी असल्याने आदिवासी चिंतेत आहेत. आमचूरच्या विक्रीतून आलेल्या पैशातून खरिपासाठी बियाणे, शेतीचे साहित्य, तसेच बैलजाेडीचीही खरेदी करण्यात येते. परंतु, यंदा अपेक्षित भाव नसल्याने खरिपाचा खर्च आणावा कोठून असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यामुळे प्रशासनाने आमचूर खरेदी-विक्रीसाठी स्वतंत्र केंद्राची स्थापना करून व्यापारी व शेतकरी यांना आधार द्यावा.