लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महामार्गाची कामे रखडल्याने आणि नव्याने निविदाही निघत नसल्यामुळे जिल्हावासीयांना सर्वच प्रमुख मार्गावरून खड्डयांमधून प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघातांची मालिका सुरू असून अनेकांना जायबंदी व्हावे लागत आहे तर काहींना जीव गमवावा लागत आहे. चारही महामार्ग ‘नही’कडे वर्ग असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरूस्तीलाही अडचणी येत असल्याची स्थिती आहे.अंकलेश्वर-बºहाणपूर, अमरावती-सुरत, शेवाळी-नेत्रंग, विसरवाडी-सेंधवा हे चार महामार्ग ‘नही’कडे अर्थात राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. या महामार्गांपैकी दोन महामार्गांचे चौपदीरीकरण तर दोन महामार्ग हे दहा मिटरचे तर त्यांचा काही भाग हा चौपदरीकरण होणार आहे. या महामार्गाच्या कामांच्या निविदा विविध टप्प्यांवर अडकल्या आहेत. परिणामी महामार्गांची दुरुस्तीही होत नाही आणि कामही सुरू होत नसल्याची स्थिती आहे.बºहाणपूर-अंकलेश्वर महामार्गहा महामार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो. त्याची लांबी जिल्ह्यात ९२ किलोमिटर इतकी आहे. शहादा, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातून जाणारा हा महामार्ग मध्यप्रदेश, महाराष्टÑ व गुजरात राज्यांना जोडतो. असे असतांनाही त्याच्या चौपदरीकरणाबाबत चालढकलपणा सुरू आहे. पूर्वी आंतरराज्य महामार्ग होता. आता तो राष्टÑीय महामार्ग क्रमांक ७५३ बी असा झाला आहे. महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्यामुळे त्याच्या दुरूस्तीकडे गेल्या तीन वर्षांपासून पुर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे.परिणामी ९२ किलोमिटरच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शहादा ते प्रकाशा दरम्यान या महामार्गाला विसरवाडी-सेंधवा महामार्ग जोडला जात असल्यामुळे काही ठिकाणी दहा मिटर रोड होऊन त्याचे काँक्रीटीकरण झाले आहे. तेवढा काय तो दिलासा आहे.एक ते दीड मिटरचे खड्डेथेट शहादा तालुक्याच्या हद्दीपासून ते गव्हाळीपर्यंत या महामार्गावर एक ते दीड मिटर व्यासाचे व तेवढेच खोल खड्डे पडले आहेत. साईट पट्टयांची अवस्था खराब झाली आहे. सलग अर्धा ते एक किलोमिटरचा चांगला रस्ता दाखवा आणि बक्षीस मिळवा असे कोणी आव्हान दिल्यास ते स्विकारणारा देखील कुणी सापडणार नाही. खड्डे चुकवितांना मोठ्या प्रमाणावर अपघात देखील झाले आहेत. शिवाय खड्डयांमुळे वाहनांचे नुकसान देखील होत आहे.दुरुस्तीचे प्रावधान नाहीमहामार्ग दुरूस्तीचे प्रावधान नाही. जे रस्ते चौपदरीकरण होणार आहेत त्यांच्या देखभाल आणि दुरूस्तीवर खर्च करू नये असे महामार्ग प्राधिकरणाचे धोरण आहे. त्यामुळेच या महामार्गांची सध्या वाट लागली असून त्यांच्या कामाला सुरूवात होत नाही तोपर्यंत वाहनचालकांना या नरक यातना भोगाव्याच लागतील यात दुमत नाही.कोळदा-खेतियाही रखडलाअंकलेश्वर- बºहाणपूर महामार्गाला जोडून जाणारा कोळदा-खेतिया रस्त्याचे काम काही ठिकाणी पुर्ण झाले आहे तर काही ठिकाणी रखडले आहे.विशेषत: प्रकाशा ते डामरखेडा दरम्यानच्या रखडलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनचालकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यातून चार मुख्य आणि तीन महामार्ग जाणार असल्याच्या घोषणा गेल्या तीन वर्षांपासून केल्या जात आहेत. परंतु एक ना भाराभार चिंध्या अशी स्थिती आहे. एकाही महामार्गाचे धड काम सुरू होत नसल्याची स्थिती आहे. केवळ वेळ मारून नेण्यासाठी घोषणा होतात आणि नंतर जिल्हावासीयांच्या तोंडाला पाणे पुसली जात असल्याचे प्रकार सध्या लोकप्रतिनिधींकडून सुरू आहेत.जिल्हावासीयांच्या जिवाचे मोल ना लोकप्रतिनधींना ना अधिकाऱ्यांना असल्याचे दिसून येत आहे. जिल्हावासीयांच्या संवेदना देखील बोथट झाल्या आहेत. रस्त्यांची एवढी भयंकर अवस्था असतांना एकही मोठे आंदोलन गेल्या तीन वर्षात झाल्याचे चित्र नाही.
जिल्हावासीयांचे सर्व मार्ग खड्ड्यातूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:08 IST