नवापूर तालुक्यातील महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात नवापूर पोलीस नाकाबंदी करीत असल्याने खाजगी बसेस आडमार्गाने नवापूर तालुक्यातून धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, गोंदीया, चंद्रपूरकडे रवाना होत असतात. २४ तासात साधारणतः नवापूरहून खान्देश, मराठवाड्याकडे शेकडो लक्झरी बसेस रवाना होत असतात. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ला प्रसिद्ध झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांनी तीन पथकांची नियुक्ती करून कारवाईला सुरुवात केली आहे. शासनाचा महसूल बुडवून आडमार्गाने जाणाऱ्या सहा बसेसवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करावी. तसेच महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील बेडकीपाडा, बाबरघाटमार्गे आमलाण, बंधारफळी, गडद, करंजी ओवरा गावातून जाणाऱ्या खासगी बस व अवजड वाहनांची वाहतूक कायमची बंद करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
आडमार्गाने जाणाऱ्या सहा खासगी बसेसवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:29 IST