याबाबत तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सकल जैन समाज हा अहिंसावादी व शांतीप्रिय समाज आहे. भगवान श्री महावीर यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य जैन संत व साध्वीजी करीत आहेत. जैन संत व साध्वींना समाजात भगवान श्री महावीर यांचे प्रतिबिंब म्हणून पाहिले जाते. अमळनेर येथील रहिवासी व उच्चशिक्षित युवक विनयचंद बागरेचा (जैन) यांचा २२ फेब्रुवारी रोजी जैन दीक्षा समारोह आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने शहरातील जैन समाजाच्यावतीने शुभेच्छा व अभिनंदनाचे फलक शहरातील विविध भागात लावण्यात आले आहेत. विनापरवानगी फलक लावल्याचे कारण देत तेथील नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दीक्षा कार्यक्रम होण्याअगोदरच दीक्षा फलक फाडून पायदळी तुडवण्यात आले. या घटनेमुळे जैन समाजावर मोठा आघात पोहोचला असून, साने गुरुजींच्या भूमीत जर प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्थेचा बडगा दाखवून अशी घटना घडत असेल तर ते मोठेे दुर्दैव आहे. या घटनेत फलकाची विटंबना करणाऱ्या पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जैन समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.कांतीलाल टाटिया, श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेशचंद्र चोरडिया, युवाशक्तीचे अध्यक्ष ॲड.चंद्रशेेखर संचेती, सचिव मनोज कोटडिया, कोषाध्यक्ष ललीत छाजेड, भरत ओस्तवाल, समीर चोरडिया, नरेश संचेती, मनोज कोचर, सुनील कोठडिया यांच्यासह समस्त जैन युवाशक्तीचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
जैन समाजाच्या दीक्षा समारंभाचे फलक फाडणाऱ्यांवर कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:30 IST