नंदुरबार : विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात जिल्ह्यात कारवाईचे सत्र सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात जवळपास ५० जणांवर कारवाई करण्यात आली असून, पोलिसांतर्फे बसस्थानक, रेल्वे स्थानकासह बाजाराच्या परिसरात मास्क वापरण्याविषयी जनजागृतीही केली जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता, विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासाठी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे. पोलिसांतर्फे कारवाईसह दंडाची आकारणी केली जात आहे. याशिवाय मंगल कार्यालये, सामाजिक सभागृहे याठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने लादण्यात आली आहेत.
गेल्या दोन दिवसात अर्थात मंगळवारी व बुधवारी पोलिसांनी जिल्हाभरात ५० जणांवर कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच दंड न भरल्यास गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पहिल्यावेळी २०० रुपये, दुसऱ्यावेळी ४०० रुपये तसेच तिसऱ्यावेळी तीच चूक झाल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे मात्र नागरिकांना मास्क लावण्याची सवय लागल्याचेही चित्र आहे.