नंदुरबार : शेतातील घरातून चोरट्यांनी ६८ हजार रुपयांचे शेती साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोंडामळी गावाच्या शिवारात राजेंद्र भाईदास पाटील (रा. सरस्वतीनगर, नंदुरबार) यांचे शेत आहे. शेतात त्यांनी घर बांधले असून, त्यात दोन पाणबुडी मोटार, केबल तसेच पंप ठेवले होते. चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आतील सर्व साहित्य चोरून नेले. त्याची किंमत ६८ हजार रुपये इतकी आहे. १७ रोजी सकाळी ही चोरी उघडकीस आल्यावर राजेंद्र पाटील यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अहिरे करीत आहे.
दरम्यान, खोंडामळी, कोपर्ली शिवारातील शेतांमधून शेतीसाहित्य चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. चोरट्यांचा शोध घेऊन या घटनांना पायबंद घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.