लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : गुजर समाज मंचतर्फे गुरुवारी मनरद, ता.शहादा येथे समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा तिसरा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात १३ जोडप्यांचे शुभमंगल समाजाच्या प्रथेनुसार लावण्यात आले. या सोहळ्याला सुमारे १० हजार समाज बांधव उपस्थित होते. हा सोहळ्यातील विवाह ठरलेल्या मुहूर्तावर लावण्यात आला.मनरद गावाजवळील पटांगणामध्ये प्रशस्त मंडप टाकण्यात आला होता. दर्शनी भागात लावलेले लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांचे बॅनर लक्ष वेधून घेत होते. तसेच विवाह सोहळ्याचा परिसर फुले व रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. या वेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, कमलताई पाटील, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, जयश्री दीपक पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माधव जंगू पाटील, ईश्वर भूता चौधरी, व्हीएसजीजीएमचे प्रमुख मोहन पटेल, जि.प.चे माजी सभापती डॉ.भगवान पाटील, के.डी. पाटील, गुजर समाज मंचचे अध्यक्ष श्रीपत पाटील, उपाध्यक्ष हरी दत्तू पाटील, मध्य प्रदेश गुजर समाजाचे अध्यक्ष विश्वासराव देसले, देवनारायण सेना, शैलेंद्रसिंग गुजर, निझरचे मणिलाल पटेल, प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी, सुरत जिल्हा बँकेचे संचालक सुनील पाटील, सुमूल डेअरीचे भरत पटेल आदी उपस्थित उपस्थित होते. सजवलेल्या पाच ट्रॅक्टर ट्रॉलीवर वरांची वाजत-गाजत वरात काढण्यात आली. वधूंनादेखील सजविलेल्या लक्झरीमध्ये लग्नमंडपात आणण्यात आले. प्रत्येक वर-वधूसाठी स्वतंत्र असे १३ स्टेज उभारण्यात आले होते. स्वतंत्र स्टेजवर वर व वधू यांना बसवून त्यांच्यासमोरच त्यांच्याकडील वºहाडी मंडळीसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. भागवतकार अविनाश जोशी व ह.भ.प. वसंत महाराज यांनी मंगलअष्टके म्हटली. लग्न वेळेवर म्हणजे दहा वाजून पाच मिनिटांनी लावण्यात आले. विवाहानंतर सर्व वर-वधूंना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र जागेवरच मनरदचे उपसरपंच संजय पाटील व ग्रामसेवक उमेश जाधव यांनी दिले. सामूहिक विवाह सोहळ्यास आलेल्या वºहाडींना भोजनासाठी महिला व पुरुष यांच्यासाठी दोन वेगळे मंडप टाकण्यात आले होते. भोजनासाठी प्लॅस्टीकच्या साहित्याचा वापर टाळण्यात आला. प्रास्ताविक हरी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शरद पाटील व सेजल रविकांत पटेल तर आभार आय.डी. पटेल व डी.सी. पाटील यांनी मानले.सामूहिक विवाह सोहळ्यासाठी सुरत येथील विश्व कल्याण ग्रुपतर्फे ५० वृक्षांची रोपे भेट देण्यात आले. नववधू-वरांच्या हस्ते या रोपांचे मनरद येथील लाभदायक विद्यामंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यातून निसर्ग जपण्याचा संदेश देण्यात आला. तसेच विश्व कल्याण ग्रुपतर्र्फेेच प्रत्येक वर-वधूंना भगवतगीता भेट देण्यात आली.४विवाह सोहळ्यामध्ये अनुचित प्रकार घडल्यास दवाखाना, डॉक्टरांची टीम, अॅम्बुलन्स, तज्ज्ञ डॉक्टर, मोबाईल स्वच्छालय, अग्निशमन दल आदींची व्यवस्था करण्यात आली होती.बुधवारपासून विवाह सोहळ्याच्या ठिकाणी मनरद, करजई व लांबोळा येथील भगिनींनी हजेरी लावली. त्यांनी स्वत: आंब्याच्या पानांपासून तोरण झेंडूची फुले गुंफून त्यापासून माळ तयार केली होती. ट्रॅक्टरला सजवण्यासाठी फुलांच्यामाळा त्यांनी तयार केल्या होत्या. तसेच वधू सासरी जाताना जे लाडू देतात तेदेखील त्यांनी स्वत:च बांधून तयार केले होते. लग्नसोहळा आटोपल्यावर परिसरामध्ये स्वच्छता राहावी यासाठी स्वत: परिसर स्वच्छ केला हे विशेष कौतुक करण्यासारखे आहे.
सामूहिक विवाह सोहळ्यात १३ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:38 IST