गेल्या आठवड्यापासून पश्चिम महाराष्ट्रात पुराने अक्षरशः थैमान घातले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड जिल्ह्यात महापूर आल्याने नागरिकांचे संसार उदध्वस्त झाले. अनेक ठिकाणी दरडी कोसळून शेकडोवर निष्पाप नागरिकांचा जीव गेला. शासन, प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून नंदुरबार तालुका विधायक समिती परिवाराकडून पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे ठरविण्यात आले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या पुढाकारातून संस्थेच्यावतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला २१ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. मदतीचा धनादेश माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मनोज रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्याहस्ते जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नगरसेवक कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी. के. पाटील उपस्थित होते.
राज्यावर पूर परिस्थितीचे अत्यंत भीषण संकट आहे. संकटाच्यावेळी शासन-प्रशासन धावूनच येईल; परंतु आपलीही मदत करण्याची सामाजिक जबाबदारी आहे. पुरात शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. दुर्देवाने अनेकांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत. ज्या-ज्यावेळी संकटे येत असतात, त्या-त्यावेळी रघुवंशी परिवार व नंदुरबार तालुका विधायक समिती जनतेच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासून शिवसेनाप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार तालुका समितीच्या शैक्षणिक संस्थेतील कर्मचाऱ्यांना पूरग्रस्तांसाठी मदतीची विनंती केली होती. त्यानुसार २१ लाखांचा धनादेश पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आल्याचेही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्पष्ट केले.