नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात विनामास्क फिरणाऱ्या पाच हजार ५८७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ११ लाख ११ हजार २०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. यामुळे कोरोना काळात लोकांना किमान मास्क वापरण्याची सवय लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनाने याबाबत कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. दररोज किमान अडीचशेपेेक्षा अधिक व जास्तीत जास्त सव्वातीनशे जणांवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. याशिवाय भादंवि कलम १८८, २६८, २६९, २९० अन्वये गुन्हेही दाखल करण्यात आले आहेेत. त्यांची संख्या ४४४ इतकी आहे. यापुढेेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनातर्फेे सांगण्यात आले आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांकडून महिनाभरात ११ लाख ११ हजार दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST