जिल्ह्यात ४५ वर्षांवरील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये नंदुरबार तालुक्यातील शिंदगव्हाण, अजेपूर, बालआमराई, गुजरजांभोली, नवापूर तालुक्यातील वावडी, निमदर्डे, केलपाडा, सागाळी, गंगापूर , शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर, धडगाव तालुक्यातील अस्तंबा, धनाजे, सोन आणि तळोदा तालुक्यातील राणीपूर, जुने सेलिंगपूर या ग्रामपंचायतींचा समोवश आहे.
तर २१ ग्रामपंचायतींमध्ये ४५ वर्षांवरील ९० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील काळंबा, कोळदा, मांजरे, कार्ली, आसाणे, नाशिंदा, खैराळे, नवापूर तालुक्यातील बोकळझर, वराडीपाडा, खानापूर, निबोणी, शहादा तालुक्यातील मोहिदा त.श, बामखेडा त.त., जयनगर, दोदवाडा, लोढरे, अंबापूर, बुढीगव्हाण, तळोदा तालुक्यातील लोभाणी, सतोणा तर अक्कलकुवा तालुक्यातील मालपाडा या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
४५ वर्षांवरील २५ ते ९० टक्के नागरिकांचे लसीकरण झालेली ४०१ गावे असून २५ टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेली १११ गावे आहेत. ग्रामीण भागात लसीकरणाबद्दल असलेले गैरसमज दूर करून नागरिकांना लसीकरणाबाबत आवाहन करण्यात येत आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवक, सामाजिक संस्था आदींचीदेखील मदत घेण्यात येत आहे. विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना लसीकरणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतीतील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे. इतरही ग्रामपंचायतींनी १०० टक्के लसीकरण करून कोरोनावर नियंत्रण आणण्यात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.