ते ऑनलाइन व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी बोलत होते. यावेळी अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, संजय मोखडे, सुनंदा बोदिले, संयोजक प्रशांत वंजारे, कार्यक्रमाचे समन्वयक गंगाधर ढवळे, सज्जन बरडे, प्रा. माधव सरकुंडे, भैयासाहेब गोडबोले आदींची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी ‘बाबासाहेबांच्या व्यवस्थांतराचा तत्त्वव्यूव्ह’ या विषयावर आपले परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले की, जात नाही ती जात, असे म्हणतात ते निखालस चुकीचे आहे. जात जन्माला आली तर ती जाईलच! परंतु बाबासाहेबांनी आपल्या बौद्धिक सामर्थ्य, अगाध ज्ञान, प्रचंड अभ्यास आणि लढ्यांच्या जोरावर इथली माणूसपण नाकारणारी मूल्यव्यवस्था नाकारली. बौद्ध धम्म हा संबंध भारतीय समाजव्यवस्थेला दिलेला पर्याय आहे, असे ते म्हणाले. आज काही भारतीय समूह समतेच्या दिशेने निघाले आहेत. मानवी कल्याणासाठीच्या सर्वहितकारी भूमिका त्यांना मान्य आहेत. अशा रीतीने भारत बौद्धमय होण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न साकार होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. महामंडळाचे पदाधिकारी डॉ. सीमा मेश्राम, छाया खोब्रागडे, अमृत बनसोड, सुरेश खोब्रागडे, संजय डोंगरे, देवानंद सुटे, सुनंदा बोदिले आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. यावेळी प्रशांत वंजारे यांनी संयोजक म्हणून तर गंगाधर ढवळे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.