आंबेडकरी युवा संमेलन : वक्त्यांचा सूर नागपूर : सध्या देशाचे राजकारण कलुषित झाले आहे. अशा परिस्थितीत राजकारणात नवक्रांती निर्माण करण्यासाठी युवकांनी राजकारणात उतरण्याची गरज आहे, असा सूर आंबेडकरी युवा संमेलनात उपस्थित वक्त्यांनी काढला. पाचवे आंबेडकरी युवा संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह उर्वेला कॉलनी येथे शनिवारी आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन माजी आयएएस अधिकारी किशोर गजभिये यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई विद्यापीठातील विधी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सुरेश माने, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत बारंगे, सर्वजित बनसोडे, संजय सूर्यंवशी उपस्थित होते. किशोर गजभिये आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले, सरकारने खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. दलित व आदिवासी युवकांच्या हक्कावर गदा आणली जात आहे. आरक्षण नाकारण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे युवकांनी उद्योग निर्मितीकडे आपले लक्ष केंद्रित करावे. अपमानास्पद असलेल्या वनवासी शब्दांवर बंदी आणून मूळनिवासी शब्दच व्यवहारात प्रचलित करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. नवशक्ती निर्माण करण्यासाठी बहुजनांनी एकीची मोट बांधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुरेश माने यांनी आजच्या परिस्थितीवर ताशेरे ओढत अन्यायाचा विरोधात पेटून उठवण्याची गरज व्यक्त केली. याप्रसंगी डॉ. प्रदीप आगलावे, श्रीकांत बारंगे, सर्वजित बनसोडे, संजय सूर्यंवशी यांनीही मार्गदर्शन केले. शीतल गडलिंग यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)
नवक्रांतीसाठी युवकांनी राजकारणात उतरावे
By admin | Updated: August 23, 2015 03:03 IST