अविष्कार देशमुख नागपूर१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य उदयास आले. त्यावेळी सर्वदूर अविकसित असलेल्या महाराष्ट्राचा विकास करण्याची मोठी जबाबदारी राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या खांद्यावर आली. आर्थिक, सामाजिक, राजकीय व लोकशाहीप्रधान पायाभूत सोयी निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य यशवंतराव यांच्या वाटी आले. महाराष्ट्र सर्वदृष्ट्या स्वावलंबी व्हावा, त्यासाठी पोषक व पूरक वातावरणाची गरज असताना यशवंतराव यांनी राज्याच्या प्रत्येक भागाचा विकास आराखडा तयार केला. अर्थातयात नागपूरचा व विदर्भाचादेखील समावेश होता. विदर्भाच्या विकासाकरिता यशवंतराव चव्हाण यांनी दादासाहेब कन्नमवार, गोपाळराव खेडकर, वसंतराव नाईक या मान्यवर पुढाऱ्यांची चांगली फळी तयार केली. त्यांची निवडही योग्य ठरली. या पुढाऱ्यांची चांगली साथ त्यांना मिळाली अन् धडाक्याने विदर्भाच्या विकासाकरिता सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण यांनी विदर्भाचा मागासलेपणाचा विचार करून त्याच्या सर्वांगीण विकासाकरिता अंदाजपत्रक तयार केले. त्यातूनच लोकसंख्येच्या प्रमाणात विकास खर्च व लोकसंख्येच्या प्रमाणात नोकरी देऊन बेकारी दूर करण्याचा विश्वास त्यांनी १९५३ सालच्या नागपूर करारात व्यक्त केला. त्यामुळेच यशवंतराव चव्हाण यांनी त्याकाळी आवश्यक ते सर्व विकास घडवून आणले. आॅगस्ट १९७२ मध्ये कापूस एकाधिकार योजना कायदा अमलात आला. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक त्याकाळी थांबली होती. विदर्भाच्या इतिहासात नागपूर करार ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. संयुक्त महाराष्ट्र मागणीच्या काळात हा करार झाला, नागपूरसह विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात जायला तयार असल्याचे करारात स्पष्ट करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकार विदर्भाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचंही करारात नमूद करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण आणि नियोजन आयोगाचे तत्कालीन सदस्य रामराव पाटील यांनी पुढाकार घेऊन खुद्द दादांच्या रामराव पाटील यांच्या नागपूरच्या घरी या कराराचे प्रारूप तयार केले. ९ जानेवारी १९६० रोजी महाराष्ट्राच्या कायदेमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरू होते. त्यासाठी यशवंतराव शहरात आले असता नागपूरच्या जनतेला भेटण्याची संधी त्यांना मिळत असल्याने मनाला आनंद होत आहे असे त्यांनी बोलून दाखविले होते. यशवंतराव यांनी कायदेमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात व्हावे असे वचन जनतेला दिले होते ते त्यांनी हे अधिवेशन घेऊन पूर्ण केले. आज यशवंतराव जाऊन बरीच वर्षे झालीत मात्र त्यांनी विदर्भासह नागपूरला दिलेले महत्त्व अथवा केलेले जनसामान्यांच्या हिताचे ते निर्णय आजदेखील महाराष्ट्रात कोणीच कधीच विसरू शकणार नाही.
यशवंतराव चव्हाण आणि नागपूर करार
By admin | Updated: March 12, 2015 02:45 IST