नागपूर : यशोधरा ही बुद्धांच्या आयुष्याची प्रस्तावना आहे. त्यामुळे बुद्धाला समजून घ्यायचे असेल तर अगोदर यशोधरेला समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरतर्फे शंकरनगर चौक येथील प्रतिष्ठानच्या सभागृहात डॉ. प्रकाश खरात यांच्या ‘यशोधरा’ या कादंबरीचा प्रकाश सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. मनोहर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रुपा कुळकर्णी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे हे मुख्य वक्ते होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य रमेश बोरकुटे व्यासपीठावर होते. डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, व्यवस्थेच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी आवाज उचलला अशा बहुजन समाजातील नायकांना खलनायक ठरवून त्यांचा आवाज दडपण्याचे काम करण्यात आले. तेव्हा इतिहासातील ज्या-ज्या व्यक्तींवर व्यवस्थेने अन्याय केला, त्यांचा आवाज दडपला अशा लोकांचा आवाज बनून त्यांचे नायकत्व प्रस्थापित करण्याचे काम आंबेडकरी लेखकांनी केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. रुपा कुळकर्णी म्हणाल्या, यशोधरा ही कादंबरी लिहून प्रकाश खरात यांनी केवळ बौद्ध साहित्यालाच नव्हे तर एकूणच मराठी साहित्यमध्ये भर घातली आहे, मराठी साहित्याला मोठी भेट दिली आहे. डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी यशोधरा कादंबरी ही बुद्ध काळातील सर्वांगीण परिस्थितीचा कोलाज असल्याचे मत व्यक्त केले. लेखक डॉ. प्रकाश खरात यांनी आपल्या मनोगतात या कादंबरीसाठी अनेक संदर्भग्रंथांचा अभ्यास करण्यासोबतच बौद्ध स्थळांना भेटी दिल्याचे सांगितले. डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी संचालन केले. याप्रसंगी आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, ई. झेड. खोब्रागडे, कृष्णा इंगळे, इ.मो. नारनवरे, भूपेश थुलकर, दादाकांत धनविजय, लोकनाथ यशवंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
यशोधरा ही बुद्धांच्या आयुष्याची प्रस्तावना
By admin | Updated: September 20, 2015 03:11 IST