सीबीएसई बारावी निकाल : विद्यार्थिनींचाच वरचष्मा
नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल सोमवारी अधिकृतरीत्या जाहीर झाले. यात उपराजधानीतील भवन्स बी.पी. विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर येथील यश अरुण कोटेचा व अनुष्का रवी गुप्ता या दोघांनी विदर्भात अव्वल स्थान पटकाविले आहे. विशेष म्हणजे हे दोघेही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असून त्यांना प्रत्येकी ९८.४ टक्के गुण मिळाले आहेत. नागपूर जिल्ह्यातून दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. विज्ञान शाखेतून नागपुरातील सेंटर पॉईन्ट , काटोल रोड येथील शशांक शिवानंद या विद्यार्थ्याने ९७.८ टक्के गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला आहे. भवन्स बी.पी. विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर येथीलच चारु लवालिया हिने ९४.८ टक्के गुणांसह ‘ह्युमॅनिटीज्’मध्ये प्रथम स्थान पटकावले आहे.(प्रतिनिधी)