जलालखेडा : भरधाव अज्ञात वाहनाने राेडच्या कडेने पायी जात असलेल्या महिलेला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वरूड-जलालखेडा-काटाेल मार्गावरील भारसिंगी नजीकच्या जाम नदीवरील पुलाजवळ शनिवारी (दि. १३) सायंकाळी घडली.
कल्पना अरुण चौधरी (४०, रा. थडीपवनी, ता. नरखेड) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या त्यांच्या भाचीच्या लग्नासाठी नारसिंगी (ता. नरखेड) येथे पाहुण्या म्हणून आल्या हाेत्या. त्यांच्या भाचीचे लग्न साेमवारी (दि. १५) आहे. खरेदी करायची असल्याने त्या दाेन महिलांसाेबत नारसिंगीहून भारसिंगीला पायी जात हाेत्या. त्या जाम नदीजवळील पुलाजवळ येताच नागपूर-काटाेलहून वरूडकडे वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने कल्पना यांना धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी पाेलिसांना सूचना देत त्यांना जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लग्नघरी शाेककळा पसरली हाेती. पाेलीस या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या वाहनांचा शाेध घेत आहेत. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.