राकेश घानोडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: पतीची कोणतीही चूक वा इतर ठोस कारण नसताना स्वत:च्या मर्जीने वेगळी झालेली आणि पतीने सोबत नांदण्याकरिता बोलावल्यानंतरही परत जाण्यास नकार देणारी पत्नी पोटगी मिळण्यासाठी पात्र नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका प्रकरणात दिला.
प्रकरणातील पत्नी अकोला तर, पती यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांचे २५ डिसेंबर २०१५ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर पत्नी केवळ दहा महिने पतीसोबत राहून माहेरी निघून गेली. तिने पोटगीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पतीवर विविध आरोप केले होते. लग्न जोडताना पती महाविद्यालयात व्याख्याता आहे. त्याला भरपूर वेतन मिळते. तो शिकवणी वर्गही चालवितो. त्याच्याकडे स्वत:चे घर व शेती आहे, अशी माहिती देण्यात आली होती. परंतु, ही माहिती खोटी होती.
पतीवरील आरोप खोटे
पती विनाअनुदानित महाविद्यालयात कार्यरत असून, त्याला केवळ नऊ हजार रुपये मासिक वेतन मिळते. तो केवळ एकाच खोलीत राहतो, असे सिद्ध झाले. पती व सासरची मंडळी वाईट वागणूकही देतात, असे पत्नीचे म्हणणे होते. परंतु, ती एकही आरोप सिद्ध करू शकली नाही.
पतीचा नकार नव्हता
पतीने पत्नीच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले किंवा नकार दिला, याबाबत कोणतेही ठोस पुरावे न्यायालयाला रेकॉर्डवर आढळून आले नाही. उलट, पतीने पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, हे रेकॉर्डवरून स्पष्ट झाले.