उन्हाळी परीक्षा तोंडावर : आतापर्यंत ५० टक्के निकालच जाहीरनागपूर : एकीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये उन्हाळी परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांची तयारी सुरू झाली आहे. परंतु दुसरीकडे हिवाळी परीक्षांच्या निकालाची गाडी मात्र रखडली असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत केवळ ५० टक्के परीक्षांचे निकाल लागले असून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. नेमके निकाल का रखडले आहेत असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.हिवाळी परीक्षांचा तिसरा टप्पा सुरू असतानाच परीक्षांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली होती. परंतु त्यानंतर मात्र निकाल काही प्रमाणात रखडल्याचे दिसून येत आहे. २९ जानेवारीपर्यंत केवळ ८३५ पैकी ४२२ परीक्षांचेच निकालच लागले आहेत. याची टक्केवारी काढली असता ती केवळ ५० टक्के इतकी येत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड््यापासून विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना सुरुवात होत आहे.अशा स्थितीत हिवाळी परीक्षांचे निकाल व उन्हाळी परीक्षांची तयारी असा दुहेरी ताण परीक्षा विभागावर पडणार आहे.जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३१६ परीक्षांचे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर मात्र हा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात ८४, दुसऱ्यात ४६९ व तृतीय टप्प्यात २८२ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या. आतापर्यंत पहिल्या टप्प्याचे ७२, दुसऱ्यातील २८५ तर तिसऱ्या टप्प्यातील ६५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ११ दिवसांकरीता ‘पोस्टपोन’ करण्यात आल्या होत्या हे विशेष. (प्रतिनिधी)लवकरच लागतील निकालयासंदर्भात परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू असून लवकरच निकाल जाहीर करण्यात येतील अशी प्रतिक्रिया मिळाली. अनेक परीक्षांचे मूल्यांकन संपले असून निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाय प्राध्यापकांनादेखील यासंबंधित सूचना देण्यात आले आहे. लवकरात लवकर निकाल लावणे यालाच प्राधान्य देण्यात येत आहे. काही परीक्षा उशिरा संपल्या अन् प्रात्यक्षिक परीक्षा लेखीनंतर झाल्या. त्यामुळे काही परीक्षांचे निकाल अडकले असल्याची प्रतिक्रिया येथील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांच्याशी मात्र संपर्क झाला नाही.
निकाल का रखडले?
By admin | Updated: January 30, 2015 00:55 IST