शिवसेना बनविणार रणनीती : अपक्ष उमेदवार वाढविणार डोकेदुखीगणेश खवसे - नागपूरलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना कौल देणारा मतदारसंघ म्हणून काटोल विधानसभा मतदारसंघाची आगळीवेगळी अशी ओळख आहे. २००९ च्या निवडणुकीत ७ हजार ९५ मतांची शिवसेनेला आघाडी देणाऱ्या मतदारसंघात यावेळी तब्बल ३८ हजार ४४६ मतांची ‘लीड’ मिळाली. या मतांमुळे आगामी विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढण्याची तयारी अनेकांनी चालविली आहे. ऐनवेळी कुणाला उमेदवारी दिली जाते, त्यावर येथील विजयरथाला ‘ब्रेक’ मिळतो की काय, ते निश्चित होईल.अनिल देशमुख हे १९९५ पासून काटोल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. १९९५ मध्ये ते अपक्ष म्हणून पहिल्यांदा विधानसभेवर गेले. त्यानंतर १९९९, २००४ आणि २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवीत ते विजयी झाले. या विधानसभेचा इतिहास पाहिला असता काँग्रेस उमेदवाराला येथील मतदारांनी निवडून दिले. १९६२ आणि १९७२ मध्ये शंकरराव गेडाम, १९७८ मध्ये मुकुंदराव मानकर, १९८० मध्ये डॉ. श्रीकांत जिचकार, १९८५ आणि १९९० मध्ये सुनील शिंदे हे येथून विजयी झाले. दरम्यानच्या काळात केवळ १९६७ मध्ये अपक्ष उमेदवार जे. एस. चांडक हे विजयी झाले. आगामी विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या तरी दुसरी इच्छुक उमेदवार नाही. देशमुख हे यापूर्वीच्या चार निवडणुकीत विजयी झाले असून, पाचव्या ‘टर्म’साठी ते सज्ज झाले आहेत. या विधानसभेत युतीची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. शिवसेनेकडून राजू हरणे हे इच्छुक असून, त्यांनी त्यादृष्टीने तयारी चालविली आहे. माजी खासदार प्रकाश जाधव यांच्यासोबतच यापूर्वी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणाऱ्या अॅड. नीलेश हेलोंडे यांचेही नाव शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये आहे. तर मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे सत्ता पक्षनेते उकेश चव्हाण यांच्याही नावाची चर्चा केली जात आहे. आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडून अभिजित गुप्ता यांचे नाव समोर आले आहे. तर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्या नावाचीही काटोलमध्ये जोरदार चर्चा आहे. शेतकरी कामगार पक्षाकडून राहुल देशमुख हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. याव्यतिरिक्त मनोज खळतकर हे निवडणूक लढविण्यास तयार असून, अपक्ष उमेदवारांचीही गर्दी या मतदारसंघात वाढणार आहे. अपक्ष उमेदवार हे प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. या विधानसभा मतदारसंघाचा विचार करता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत येथील मतदारांचा कौल वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांकडे राहिला आहे. अर्थात लोकसभेत शिवसेनेला मताधिक्य वाढवून देण्यात मदत करणारे येथील मतदार विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पसंती दर्शवितात, असा मागील काही निवडणुकीचा अनुभव आहे. या निवडणुकीतही हेच समीकरण राहील काय, हे सांगणे सध्या तरी अवघड आहे.शिवसेनेच्या बाबतीत विचार करावयाचा झाल्यास १९९९, २००४ आणि २००९ या तीन विधानसभा निवडणुकीसाठी काटोलमधून उमेदवार दिला. १९९९ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर, २००४ मध्ये दुसऱ्या तर २००९ मध्ये ‘रिडालोस’चे चरणसिंग ठाकूर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतल्याने, शिवसेनेच्या किरण पांडव हे तिसऱ्या क्रमांकावर गेले. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांमध्ये ४ हजार ५६८ मतांचा फरक होता. बंडखोर, अपक्षांवरच खरे तर काटोल विधानसभा मतदारसंघात मतांची बेरीज-वजाबाकी केली जाऊ शकते. त्यामुळे सध्या तरी अशा इच्छुक उमेदवारांवर पक्षाने नजर रोखून धरण्याची वेळ आली आहे, अन्यथा ते डोकेदुखी वाढतील.
विजयरथ कोण रोखणार?
By admin | Updated: June 13, 2014 01:22 IST