‘तांत्रिक बिघाडाचे’ गूढ : वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे आव्हान जीवन रामावत नागपूरवन विभागाची ‘वनबाला’ ही बच्चे कंपनीची पहिली पसंती आहे. विशेषत: दिवाळीच्या सुट्यांमध्ये या ‘ट्रेन’ चे मुलांमध्ये खास आकर्षण असते. परंतु वन विभागाने मागील काही महिन्यांपासून तांत्रिक कारण पुढे करून ही ट्रेन कुलूपबंद करू न ठेवली आहे. त्यामुळे ‘वनबाला’ मध्ये बसून जंगल सफारी करण्याची इच्छा घेऊन, सेमिनरी हिल्स येथे येणाऱ्या बच्चे पार्टीचा फार मोठा हिरमूस होत आहे. विशेष म्हणजे, संबंधित वन अधिकाऱ्याचा हा नेहमीचाच उद्योग झाला आहे. ‘तांत्रिक बिघाडाच्या’ नावाखाली तिला वारंवार बे्रेक लावला जात आहे. जाणकारांच्या मते, या ट्रेनपासून वन विभागाला फारसे उत्पन्न मिळत नाही. परंतु ही ट्रेन उत्पन्न मिळविण्याचे साधन नसून, ती वन विभागाची ओळख आहे, हे संबंधित अधिकाऱ्यांनी समजले पाहिजे. परंतु संबंधित वन अधिकारी या ट्रेनपासून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने तिच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘वनबाला’ ही नागपुरातील एकमेव ‘मिनी ट्रेन’ आहे. येथील बालोद्यानात येणाऱ्या बच्चे कंपनीला ट्रेनमधून जंगल सफारी करण्याचा आनंद लुटता यावा, या हेतूने मागील १९७८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या ‘मिनी ट्रेन’ चा शुभारंभ करण्यात आला होता. तेव्हापासून ‘वनबाला’ ही वन विभागाची खास ओळख बनली आहे. मागील तीन वर्षांपूर्वी वन विभागाने ती जुनी ट्रेन थांबवून, नवीन ट्रेन तयार केली. त्यावर लाखो रुपयांचा खर्चही करण्यात आला. शिवाय तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते त्या नवीन ट्रेनचे पुन्हा उद्घाटन करण्यात आले. परंतु मागील तीन वर्षांत ही ट्रेन जेवढ्या दिवस धावली नसेल, त्यापेक्षा अधिक वेळा तिच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. संबंधित वन अधिकाऱ्याने तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करून या ट्रेनला वेळोवेळी ब्रेक लावला आहे. त्यामुळे या ट्रेनमधील ‘तांत्रिक बिघाडाचे’ एक गूढ निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, नागपुरात राज्याच्या वन विभागाचे मुख्यालय आहे, त्यामुळे कुणी तरी वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात विशेष लक्ष घालून, या ट्रेनमधील ‘तांत्रिक बिघाड’ कायमचा दूर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील चार वर्षांतील या ट्रेनचा प्रवास, तांत्रिक बिघाड व झालेला खर्चाची चौकशी केली तर घबाडच निघू शकते.
वनबालाचा ‘वनवास’ कधी संपणार ?
By admin | Updated: November 16, 2015 02:47 IST