मंगल कार्यालयाचे व्यवस्थापन जबाबदार : पोलिसांचा परवाना आवश्यक नागपूर : लग्नाच्या वरातींमुळे किंवा त्यासाठी आलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन इतरांना त्रास होण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. त्याचा त्रास झाल्यावर सामान्य लोक तेवढय़ापुरती ओरड करतात; मात्र यातून ना सरकारी यंत्रणा बोध घेत आहे, ना लग्नसमारंभ करणारे आणि मंगल कार्यालयाचे व्यवस्थापनही. या सर्वांंंच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे दरवेळी लग्नसराईत लोकांना त्रास होतोच आहे.लोकही नियम पाळत नाहीतया प्रश्नाला कोणी एक यंत्रणा जबाबदार नाही. सर्वांंंच्याच दुर्लक्षाचे आणि नियमभंग करण्याच्या वृत्तीचे हे फलित आहे. मुळात आपल्याकडील बहुतांश मंगल कार्यालये ही मुख्य रस्त्यावर, महामार्गावर किंवा बाजारपेठेत आहेत. त्यांच्याजवळ वाहनतळासाठी पुरेशी सोय नाही. वाहतुकीची कोंडी झाल्यास त्यातून मार्ग काढण्यासाठी स्वत:ची यंत्रणा नाही; शिवाय तेथे येणारे लोक नियम पाळतातच असे नाही. लोकांना वाहतुकीची शिस्त नकोच असते. लोकांना अशी शिस्त लावण्यापेक्षा पोलिसांना इतर कामातच जास्त रस असतो. अशा सगळ्या बेशिस्तीच्या मामल्यातच लग्नसमारंभ पार पडतात. लग्नाच्या वराती काढण्यासाठी पोलिसांचा परवाना घ्यावा लागतो. रस्त्याने वाजतगाजत मिरवणूक काढण्यासाठी तर तो आवश्यकच असतो; मात्र कित्येक लोकांना याची माहितीही नसते. असली तरी परवाने घेतले जात नाहीत. त्यामुळे वरातीच्या नावाखाली रस्त्यावर कसाही गोंधळ घालण्यास वर्हाडी मंडळी मोकळी राहतात.लग्नाच्या वरातीला सूट असते काय?अलीकडे तर लग्नाच्या मिरवणुकीत मोठमोठय़ा सीडी प्लेअरच्या गाड्या दिसू लागल्या आहेत. रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीचा विचार न करता ही मिरवणूक काढली जाते. जवळपास पोलीस असले तरी ते त्याकडे लक्ष देत नाहीत. जणू लग्नाची वरात असली म्हणजे त्यांना सगळे माफ आहे, असाच समज झालेला दिसतो. भररस्त्यात नाचणे, फटाके आणि शोभेच्या दारूची आतषबाजी करणे, एवढचे नव्हे तर प्राण्यांनाही मिरवणुकीत आणणे, असे प्रकार आता होऊ लागले आहेत. शाही विवाह किंवा श्रीमंतीचा थाट या नावाखाली हे केले जाते. त्याचा त्रास इतर लोकांना होतो, याकडे कोणीही लक्ष द्यायलाच तयार नाही. मंगल कार्यालय चालक पैसे कमावतात. वरातीतील मंडळी नाचून व मस्ती करून मजा करतात; पण सामान्यांना त्याचा त्रास भोगावा लागतो, याची कोणाला ना खंत आहे, ना खेद. (प्रतिनिधी)वाहतुकीची कोंडी करणारे वराती मोकळेसर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी कोणी रास्ता रोको आंदोलन केले, तर पोलीस लगेच गुन्हे दाखल करून मोकळे होतात, मग रस्ता अडवून वाहतुकीची कोंडी करणार्या या वरातींना मात्र मोकळे सोडतात. जमावबंदीच्या आदेशातून या वरातींना वगळण्यात आलेले असले तरी याचा अर्थ त्यांना रस्त्यावरील वाहतूक अडविण्याचा परवाना दिला आहे, असा तर होत नाही ना? त्यांना असलेल्या परवान्यांच्या अटींचे पालन होते किंवा नाही, हे पोलिसांनी पाहायला नको का? तसाच नियम मंगल कार्यालयांना का लावला जात नाही? विवाह समारंभासाठी भरमसाट भाडे वसूल करणार्या या मंगल कार्यालयांनाही परवाने आणि अटी आहेत. त्यांनी वाहनतळाची सोय केली पाहिजे, ही त्यातील प्रमुख अट आहे. तिचे पालन किती ठिकाणी झाले आहे? येणार्या वाहनांमुळे कोंडी होऊ नये, याची दक्षता घेतली जाते आहे का? तशी सूचना मंगल कार्यालय व्यवस्थापनाने विवाह समारंभ आयोजकांना दिली आहे का, याचा कोणीच विचार करीत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याचा त्रास नेहमीचाच झाला आहे. जर प्रशासन स्वत:हून यात पुढाकार घेणार नसेल, तर कोंडी झाल्यावरच ओरड करणार्या लोकांनी आणि इतर संघटनांनी जनमताचा रेटा का तयार करू नये? अशी प्रतिक्रिया युवकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
वरातींना शिस्त कधी लागणार?
By admin | Updated: June 9, 2014 01:23 IST