मोरेश्वर मानापुरे - नागपूर शिवणगावातील पुनर्वसन यादीत निर्माण झालेला घोळ अद्यापही सुटलेला नाही. संपूर्ण गावाने यादीवरच आक्षेप घेतल्याने, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी निघण्याची चिन्हे सध्यातरी धूसर झाली आहेत. पुनर्वसन नाही तर टॅक्सी-वे नाही, अशी भूमिका गावकर्यांनी घेतल्याने एअर इंडिया आणि बोईंगचा एमआरओ केव्हा सुरू होणार, या प्रश्नावर अधिकार्यांनी मौन पाळले आहे. भारतीय उपखंडातील एक अत्याधुनिक प्रकल्प म्हणून या प्रकल्पाची गणना होत असून, यामध्ये बी-७३७ एस, बी-७७७ एस आणि बी-७८७ ड्रीमलायनर विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध होईल. करारानुसार एअर इंडियाला या ठिकाणी मोफत सेवा पुरविली जाणार आहे. केसकरांची फेब्रुवारीत पाहणी सुमारे ५0 एकर जागेवर ५५0 कोटी रुपये गुंतवणुकीतून उभा होणारा बोईंग एमआरओ लवकरच सुरू होईल, असे वक्तव्य बोईंग इंडियाचे अध्यक्ष आणि बोईंग इंटरनॅशनल ट्रेडिंगचे उपाध्यक्ष दिनेश केसकर यांनी नागपुरात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बोईंगच्या पाहणीदरम्यान केले होते. कामात येणारे अडथळे शासनाने तातडीने सोडवावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. पण शासनाने अडथळे सोडविण्यात तत्परता न दाखविल्याने टॅक्सी रन-वे अद्यापही पूर्ण होऊ शकला नाही. शिवणगाववासीयांनी शासनाचे पुनर्वसन प्रश्नाकडे लक्ष वेधावे म्हणून टॅक्सी-वेचे काम थांबविले आहे. एमआरओ प्रकल्पाचे काम मार्च २0१३ पर्यंत पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी गेल्या वर्षी म्हटले होते. शिवणगाववासीयांचे आंदोलन शिवणगावच्या ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या बोईंग-वे चे काम बंद पाडले. आधी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा, मगच काम सुरू करू देऊ, असा पवित्रा गावकर्यांनी घेतला आहे. राहत्या घरमालकाची सिटी सर्वेमध्ये नोंद व्हावी, अशी गावकर्यांची मागणी आहे. पुनर्वसन करण्यासाठी शासनाने आखीव पत्रिकेतील रहिवासी नावाचा वाद जाणीवपूर्वक उपस्थित केल्याचा गावकर्यांचा आरोप आहे. गावात राहतात (कब्जा वहिवाटदार) त्यांचेच पुनर्वसन करण्याची मिहान प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. शासन आणि गावकर्यांच्या भांडणात जमीन परत करा शासनाच्या कुचकामी धोरणामुळे आता दुसरी धावपट्टी होणे शक्य नाही. त्यामुळे शिवणगावच्या जमिनी शासनाने परत कराव्यात, अशी मागणी मिहान प्रकल्पग्रस्तांचे नेते बाबा डवरे यांनी केली आहे. शासनाने अल्पशा मोबदल्यात २00२ मध्ये जमिनीचा ताबा घेतला. त्या जमिनीवर उद्योग सुरू झालेले नाहीत. लाखोंना रोजगार मिळतील, अशा घोषणा हवेतच राहिल्या. युवकांना मिळालेला रोजगारही वीजप्रश्नामुळे हिरावून घेण्याची भीती निर्माण झाली आहे.
‘बोईंग एमआरओ’ केव्हा सुरू होणार?
By admin | Updated: May 16, 2014 00:42 IST