वातावरण तापले : धनदांडग्यांच्या कर्जमाफीनंतर टीकास्त्रउमरेड : देशातील मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी देणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियावर तोंडसुख घेतले जात आहे. सोबतच सरकारवरही ग्रामीण भागातून टीकास्त्र सोडले जात असून शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार, याबाबतचा निर्णय कधी घेणार, असा सवाल आता यानिमित्ताने विचारला जात आहे. सरकार आणि बँका केवळ धनाढ्यांचाच विचार करीत असेल तर हे योग्य नाही. बँक आणि सरकारने उद्योगपतींच्या या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.उद्योगपतींच्या कर्जमाफी निर्णयावर प्रतिक्रिया घेतल्या असता, उमरेड पालिकेचे उपाध्यक्ष गंगाधर रेवतकर म्हणाले, शेतकरी - शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी यांना एकीकडे रांगेत लावायचे आणि दुसरीकडे उद्योगपतींना कर्जमाफी द्यायची. सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी करणारे हे सरकार आहे. नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्य असला तरी नियोजनशून्य परिस्थितीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे, असेही ते म्हणाले. युवा नेते राजू पारवे म्हणाले, मोलमजुरी बुडवून बँकेत हजार - दोन हजार मिळतील या आशेने अनेकांचा दिवस वाया जात आहे. त्यातही पैसे मिळतील की नाही याचा नेमही राहिला नाही. एकीकडे असंख्य शेतकऱ्यांची खाती असलेल्या जिल्हा बँकेलाही पाचशे, हजाराच्या नोटा स्वीकारण्यासाठी मनाई केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. उमरेड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर खानोरकर यांनीही कर्जमाफीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. याऐवजी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असते तर भविष्यातील आत्महत्या तरी थांबल्या असत्या. रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या शेतकरी - शेतमजुरांचे हे सरकार राहिले नाही तर ‘एसी वाल्या’ धनदांडग्यांचे झालेले आहे, असाही घणाघात त्यांनी केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विलास झोडापे यांनीही हा अतिशय चुकीचा निर्णय असून तीव्र शब्दात निषेध नोंदविला. शेतकरी - शेतमजुरांनी कोणत्याही अपेक्षा ठेवू नये. भांडवलदारांचेच शासन आहे. आज ना उद्या हा निर्णय होणारच होता; तो झाला. सरकार प्रत्येक निर्णयाला देशभक्तीसोबत जोडून तरुणांची डोकी भडकविण्याचे काम करीत असल्याचाही आरोप झोडापे यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?
By admin | Updated: November 18, 2016 03:06 IST